
या वेळी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन एमएयुएस-१६२, तूर बीडीएन ७१६, कापूस एनएच १९०१ बीटी व एनएच १९०२ बीटी व ज्वारी (परभणी शक्ति) या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतशिवारात या वाणांचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या सरळ वाणाच्या कापसाची खरीप हंगामात पेरणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. तसेच त्यांनी कापूस पिकाच्या नवीन सुधारीत वाणाच्या उत्पादनात वाढ कशी करता येईल, यावर भर देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की कापसाची पेरणी वेळेच्या अगोदर केल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत कापसावर येणारी कीड ही आसपासच्या नविन पिकांवर पसरते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच मागील वर्षी उरलेल्या कापसाच्या पराट्यांमध्ये राहिलेली कीड नवीन लागवडीसाठी धोकादायक ठरते. यासंदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी योग्य सल्ला व मार्गदर्शन दिले.
डॉ. वा. नि. नारखेडे, मुख्य शास्त्रज्ञ, यांनी सांगितले की खरीप हंगामाच्या सुरुवातीस पाऊस झाल्यानंतर जमिनीत योग्य वापसा आल्यानंतर सोयाबीन, तूर, कापूस, मुग आणि ज्वारी या पिकांची तत्काळ पेरणी करावी. यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांच्या बियाण्यांचा उपयोग करावा.
तसेच त्यांनी खरीप पिकांमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यामध्ये सोयाबीन + तूर, ज्वारी + तूर, कापूस + सोयाबीन, कापूस + तूर या पद्धतींचे फायदे आणि अंमलबजावणी याविषयीही सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.
डॉ. एम. एस. पेंडके, कृषि अभियंता, यांनी मेळाव्यातील उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की, पिके फुलोऱ्यावर असताना किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडल्यास तात्काळ पाणी देणे आवश्यक आहे. यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन या आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करावा.
डॉ. जी. के. गायकवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र), यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की तेलबिया व दाळवर्गीय पिकांमध्ये स्फुरद व गंधकयुक्त खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते.