kanda bajar bahv : कांदा बाजारभाव वधारणार? बांग्लादेशात कांदा निर्यात लवकरच सुरू होणार..

kanda bajar bhav : महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रति क्विंटल २०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांद्याचे दर ६५० ते १३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. शेतकऱ्यांना या दरामुळे नुकसान सहन करावे लागत असतानाच आता बांग्लादेशातून येणाऱ्या मागणीमुळे थोडी आशा निर्माण झाली आहे.

बांग्लादेशमध्ये सध्या स्थानिक कांद्याचा साठा संपत आला आहे. त्यामुळे तेथील किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढू लागले आहेत. ढाका, खुलना आणि चिटगावसारख्या मोठ्या शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ दर प्रति किलो ६५ ते ७० टकापर्यंत पोहोचले आहेत, जे भारतीय चलनात सुमारे ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो इतके होतात. त्यामुळे भारतातून, विशेषतः महाराष्ट्रातून कांदा आयात करण्यासाठी तेथील व्यापारी उत्सुक आहेत.

नाशिकमधील काही कांदा व्यापाऱ्यांनी या संधीचा अंदाज घेऊन बांग्लादेशात कांदा निर्यातीचे नियोजन सुरू केले आहे अशी माहिती मिळत आहे. येत्या आठवड्याभरात ही निर्यात प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता आहे. निर्यातीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच पहिली कांद्याची खेप रवाना होईल.

निर्यातीमुळे शेतकऱ्यांना बाजारात चांगले दर मिळण्याची शक्यता आहे. विशेषत: गोल्टी कांद्याचे जर जे सध्या ३०० ते ४०० रुपये आहेत, ते वाढू शकतात असा अंदाज आहे. यामुळे सध्या कमी पडलेली बाजारपेठ सावरण्यास मदत होईल. बांग्लादेशातील वाढती मागणी लक्षात घेता, भारतातून होणारी निर्यात ही दोन्ही देशांसाठी फायद्याची ठरू शकते.

सध्या राज्यात कांद्याचा पुरवठा मुबलक आहे. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजारात आणला आहे. त्यामुळे स्थानिक पुरवठा वाढला असून दरात घसरण झाली आहे. परंतु निर्यात सुरू झाल्यास स्थानिक बाजारात दबाव कमी होईल आणि दरात स्थिरता येईल.

एकूणच, बांग्लादेशातील कांद्याच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत निर्यातीला वेग मिळाल्यास बाजारात सकारात्मक बदल घडेल.