पंतप्रधान मंत्री पिक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरू असून आत्तापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत.
यापैकी आतापर्यंत 965 कोटी रक्कम वितरित करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरणाचे काम प्रगतीपथावर आहे. अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सादरीकरणात देण्यात आली . त्याचबरोबर बैठकीनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानी संदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती. आता 12 जिल्ह्यांमध्ये अधिसूचनेवर विमा कंपनीचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत.
राज्यस्तरावर सध्या बीड, बुलढाणा ,वाशिम, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर ,पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरू असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी संपली आहे.
पंतप्रधान मंत्री पिक विमा योजनेतील 1 कोटी सत्तर लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ एक रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिक विमा दिला आहे . 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपयाचा पहिला हप्ता देण्यात आला आहे.
पर्जन्यमान आणि पीक पेरणी :
राज्यात 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या 86 टक्के पाऊस (928.8 मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी 58 लाख 76 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आत्तापर्यंत 28 टक्के पेरणी झाली आहे . सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे. गतवर्षी या सुमारास तेरा लाख पन्नास हेक्टर पेरणी झाली होती. यावर्षी पंधरा लाख 11 हेक्टर पेरणी झाली असून रब्बी हंगामात ज्वारी हे महत्त्वाचे पीक असून 17 लाख 53 हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या सरासरीचे 45 टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे . हरभऱ्याचे क्षेत्र 21.52 लाख हेक्टर असून यावर्षी 5.64 लाख हेक्टर म्हणजे सरासरीच्या 26 टक्के पेरणी झाली आहे.












