आता जिल्हा बँकेची बळिराजा योजना; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार…

आता जिल्हा बँकेची बळिराजा योजना; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज उपलब्ध करून देणार

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी बळीराजा मुदत कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  या योजनेच्या माध्यमातून बँकेच्या शेतकरी सभासदांना शेती विषयी विविध कामाच्या खर्चासाठी या योजनेच्या माध्यमातून तात्काळ गरज पूर्ण केली जाणार आहे.

योजनेची लवकर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्हा बँकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या नवीन योजना तसेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतची बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दुर्गाडे बोलत होते.  यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदणे ,उपसरव्यवस्थापन संजय शितोळे, सहाय्यक सरव्यवस्थापक समीर राजपूत ,संजय वाबळे सुधीर पाटोळे, गिरीश जाधव उपस्थित होते. 

दुर्गाडे पुढे म्हणाले, बळीराजा योजनेत गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत कर्जदार सभासद शेतकऱ्यांना प्रति एकरी दीड लाख रुपये कमाल सात लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे.  या कर्जासाठी सभासदांना दर साल दर शेकडा (द. सा. द. से.) १०.५ टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे.

याशिवाय केंद्राच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेत कृषी व पूरक सेवा प्रक्रिया उद्योग तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निधी,कृषी पायाभूत सुविधा वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ योजनेतंर्गत कर्जपुरवठा सुरु करण्यात आला आहे.’’

◼️ बँकेतर्फे 165 कोटींचे गृह कर्ज.

जिल्हा बँकेने नोकरदारांसाठी दर साल दर शेकडा ८ टक्के  व्याजदराने गृह कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे.  त्यानुसार आत्तापर्यंत 165 कोटींचे गृह कर्ज वाटप करण्यात आले आहे.  त्याशिवाय १२२ कोटी रुपयांची शैक्षणिक कर्ज वाटप देखील करण्यात आलेले आहेत.नोटबंदी काळातील 22 कोटी रुपयांच्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा अद्यापही बँकेकडे तशाच पडून आहेत . याबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव दिला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

◼️ एजन्सी मार्फत नोकर भरती होणार.

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमध्ये पूर्वी नेमलेल्या एजन्सी बाबत राज्यातील अनेक लोकांनी तक्रारी केल्याचे उघडकीस आले आहे.  त्यामुळे संबंधित एजन्सीचा करार बँकेने रद्द केला असून,बँकेतील विविध संवर्गातील ३५६ रिक्त जागांची भरती ही पूर्वी प्राप्त झालेल्या अर्जांमधूनच केली जाणार आहे. यासाठी लवकरच नवीन एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे , सध्या जिल्हा बँकेत सध्या 800 हून अधिक जागा रिक्त असल्याचे यावेळी दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.

Leave a Reply