राज्यभरातील दूध उत्पादक शेतकरी आज दि. २८ जूनपासून गायीच्या दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी उपोषणे, निदर्शने, रास्तारोको करावीत, असे किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांनी आवाहन केले आहे. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १ जुलै रोजी निदर्शने करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारचे दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. २८ जूनपासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू होत आहे.असे उमेश देशमुख म्हणाले . समविचारी विविध शेतकरी संघटना व किसान सभा , कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा..
गेले वर्षभरापासून शेतकरी दूध दराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत . प्रति लीटर १० ते १५ रुपयांचा तोटा दूध उत्पादक शेतकरी सहन करत आहे.परंतु आता दूध उत्पादनामधील वाढता तोटा वाढत चाललेला आहे व आता सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे
दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता ..
कायमचा दूध दराचा प्रश्न सोडविण्यासाठी दूध धोरण दीर्घकालीन स्वरूपाचे तयार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा, यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करण्यात यावे , दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करण्यात यावी , पशुखाद्य व पशू औषधांचे दर नियंत्रित करावेत,दूध भेसळ रोखावी,खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा,आदी मागण्याही संघर्ष समितीने केल्या आहेत, असेही उमेश देशमुख म्हणाले.अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा,मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दुध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरु करण्यात यावी अश्या मागण्या संघर्ष समिती करत आहे. दुध उत्पादकांच्या या मागण्यांची तातडीने राज्य सरकारने दखल घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.