Dam water storage : गंगापूर, उजनी, दारणा धरण ६० टक्के भरले; असा आहे राज्यातील पाणीसाठा…

Dam water storage : मागील दोन दिवसांपासून मध्य महाराष्ट्रा आणि कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे काही धरणांमध्ये जूनमध्येच ५० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत एकूण पाणीसाठा ३५.५८ टक्के इतका नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १९.८५ टक्के होता. त्यामुळे सध्या राज्यात मागील वर्षीपेक्षा चांगल्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे, मात्र अजूनही बहुतांश धरणांमध्ये साठा ५० टक्क्याच्या खाली आहे.

विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक ४२.६५ टक्के पाणीसाठा आहे, तर नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजे ३१.७५ टक्के पाणीसाठा आहे. अन्य विभागांमध्ये अमरावतीत ३९.०८ टक्के, पुणे विभागात ३६.२७ टक्के, नाशिकमध्ये ३५.७३ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ३०.९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सर्व विभागांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर विभागात मागील वर्षी केवळ ९.२५ टक्के पाणीसाठा होता, जो यंदा तिपटीहून अधिक आहे.

प्रमुख धरणांमध्ये उजनी (भीमा नदीवरील) धरणात सर्वाधिक ६२.९२ टक्के उपयुक्त साठा नोंदवला गेला आहे. यामध्ये गतवर्षी तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोयना धरणात २७.३५ टक्के साठा असून, त्याच वेळी जायकवाडी धरणात २९.६५ टक्के पाणीसाठा आहे. या तिन्ही धरणांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे.

नाशिक विभागातील गंगापूर धरणात ६५.३९ टक्के, तर दारणा धरणात ६२.२७ टक्के साठा आहे. गिरणा धरणात मात्र केवळ २१.५३ टक्केच पाणी शिल्लक आहे. भंडारदरा धरणात ३४.४० टक्के साठा असून, गतवर्षीच्या तुलनेत थोडीशी वाढ झाली आहे.

विदर्भातील गोसी खुर्द धरणात १४.८८ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षाच्या तुलनेत तो निम्म्याहून कमी आहे. पुणे विभागातील वीर धरणात ५७.३१ टक्के, पवना धरणात ३६.८३ टक्के, तर पानशेत धरणात २५.०५ टक्के साठा आहे. हे सर्व साठे मागील वर्षाच्या तुलनेत भरलेले आहेत.

कोकणातील राधानगरी धरणात ५६.१५ टक्के साठा असून, वैतरणा धरणात ४९.४७ टक्के पाणी आहे. तानसा धरणात मात्र केवळ ३०.४२ टक्के साठा नोंदवण्यात आला आहे.