
Dam water discharge: राज्यात २५ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार कोकण, पुणे आणि नाशिक विभागातील काही प्रमुख धरणांतून नद्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. तसेच काही बंधाऱ्यांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर अनेक धरण क्षेत्रांत चांगला पाऊसही झाला आहे.
कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील भातसा धरणातून भातसा नदीत 3711 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. सयूआ धामणी धरणातून सयूआ नदीत 2656 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.
नाशिक विभागात अप्पर वैतरणा धरणातून वैतरणा नदीत 1378 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 2294 क्यूसेक्स, तर दारणा धरणातून 2030 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणातून तापी नदीत 2543 क्यूसेक्स आणि वाघूर धरणातून वाघूर नदीत कोणताही विसर्ग नोंदवलेला नाही.
पुणे विभागातील खडकवासला धरणातून मुळा नदीत 3762 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. घोड धरणातून घोड नदीत 5500 क्यूसेक्स, तर वीर धरणातून नीरा नदीत 27797 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. कृष्णा-कण्हेर धरणातून वेणा नदीत 3800 क्यूसेक्स आणि कृष्णा नदीवरील उजनी धरणातून 50000 क्यूसेक्स विसर्ग नोंदवण्यात आला आहे. राधानगरी धरणातून भोगवती नदीत 3100 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.
राज्यातील काही बंधाऱ्यांतूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे. नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत 10986 क्यूसेक्स, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा बंधाऱ्यातून तापी नदीत 23418 क्यूसेक्स, साताऱ्यातील खोडशी बंधाऱ्यातून कृष्णा नदीत 1858 क्यूसेक्स, तर सांगली जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यातून कृष्णा नदीत 8212 क्यूसेक्स विसर्ग झाला आहे.
गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाच्या नोंदीप्रमाणे, दारणा धरण क्षेत्रात 134.3 मिमी, गंगापूरमध्ये 49.8 मिमी, खडकवासला परिसरात 107 मिमी, घोड धरणाजवळ 156 मिमी, वीर धरण क्षेत्रात 787 मिमी, राधानगरी धरण क्षेत्रात 88 मिमी आणि कोयना परिसरात 412 मिमी इतका पाऊस झाला आहे.
या पाण्याचा विसर्ग लक्षात घेता नदीकाठच्या भागांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच पेरणी व मशागतीचे नियोजन सध्याच्या पावसाच्या वितरणानुसार करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.