Railway reservation : आता आधारकार्ड जोडले तरच मिळणार रेल्वेचे रिझर्वेशन..

Railway reservation : प्रवाशांच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर होईल असा निर्णय रेल्वेने घेतला असून आता रिझर्वेशनसाठी आधारकार्ड जोडणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार कमी होऊन अनेक शेतकऱ्यांना तीर्थयात्रा आणि नित्य कामांसाठी आता आरक्षण मिळणे सोपे होणार आहे.

तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घोषित केल्या आहेत. या सुधारणा वापरकर्त्यांचे प्रमाणीकरण अधिक काटेकोर करणे आणि योजनेचा गैरवापर कमी करण्याच्या उद्देशाने केल्या आहेत.

नवीन तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत:

1. ऑनलाईन तात्काळ आरक्षणासाठी आधार प्रमाणीकरण
दिनांक 1 जुलैपासून आयआरसीटीसीचे अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपद्वारे तात्काळ तिकिटांचे आरक्षण फक्त आधारने प्रमाणित केलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

याचसोबत 15 जुलै 2025 पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल.

2. पीआरएस काउंटरवर आणि मध्यस्थांच्या माध्यमातून तात्काळ तिकीट आरक्षणासाठी प्रणाली आधारित ओटीपी प्रमाणीकरण:
संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरवर आणि अधिकृत मध्यस्थांद्वारे (एजंट्स) आरक्षित तात्काळ तिकिटांसाठी आरक्षण करताना वापरकर्त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्रमाणीकरण पाठवणे आवश्यक असेल.

ही तरतूद देखील 15 जुलै 2025 पासून लागू होईल.

3. अधिकृत मध्यस्थांसाठी आरक्षण वेळेचे निर्बंध:
सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण कालावधीत होणाऱ्या बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट मध्यस्थांना प्रारंभिक दिवस तात्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत.

वातानुकूलित श्रेणीसाठी, हे निर्बंध सकाळी 10:00 ते 10:30 पर्यंत आणि बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी, सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत लागू राहतील.

तात्काळ आरक्षणामध्ये पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि योजनेचे फायदे खऱ्या अंतिम वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची सुनिश्चिती करण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत.

सीआरआयएस आणि आयआरसीटीसीला प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे आणि सर्व विभागीय रेल्वे आणि संबंधित विभागांना त्यानुसार माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्रालय सर्व प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन करत आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयआरसीटीसी वापरकर्ता प्रोफाइलशी आधार जोडणीची खातरजमा करावी.