
देशात मान्सूनने आपली हजेरी लावायला सुरुवात केली असून महाराष्ट्रात अजूनही त्याची चाल स्थिर आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मॉन्सून अजूनही मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर, पुरी या भागांपर्यंत पोहोचला आणि स्थिर आहे. मात्र केरळ, कर्नाटक किनारपट्टी, कोकण व गोवा येथे पावसाची स्थिती सक्रिय असून या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ईशान्य भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
*महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती काय आहे?*
महाराष्ट्रात सध्या मान्सून सीमारेषा मुंबई, अहिल्यनगरपर्यंत पोहोचली आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती धीमी असून पावसाचा जोर कमी आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
*पावसाचे इशारे व हवामान स्थिती*
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग काही भागांत ३० ते ५० किमी/ताशी इतका असू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसंबंधित कामे करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
*पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा सविस्तर अंदाज*
*४ जून*
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वीजांसह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ३०-४० किमी/ताशी राहू शकतो.
*५ जून*
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा इशारा आहे.
*६ जून*
विदर्भ व मराठवाडा भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे.
*७ जून*
विदर्भ, मराठवाडा व कोकण भागात हलक्या सरींची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आंबा, डाळिंब व अन्य फळबागांना आधार देण्याची खबरदारी घ्यावी.
*८ जून*
राज्यात कुठल्याही भागात मोठा इशारा नाही. हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
*शेतकऱ्यांसाठी सूचना*
शेतकऱ्यांनी आत्ता बियाणे खरेदी, खते व औषधांची तयारी सुरू ठेवावी. ज्या भागात वीजांचा व वाऱ्यांचा इशारा आहे, तिथे ऊस, केळी, डाळिंब, मिरची इत्यादी पिकांना आधार द्यावा. काढणी केलेली शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा.
मान्सूनची पूर्ण ताकद अजून महाराष्ट्रात पोहोचलेली नसली तरी काही भागांमध्ये सुरुवातीचा पाऊस होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवून शेतीची तयारी ठेवावी.