
Today kanda bazarbhav : भारतीय हवामान खात्याचा यंदाच्या मॉन्सूनचा पहिला अंदाज प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार यंदा देशात सरासरीच्या ५ टक्के जास्त म्हणजेच १०५ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातही कांदा पट्टा असलेल्या मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होणार असल्याने येणाऱ्या खरीप आणि रबी कांदा लागवडीला बळ मिळण्याची शक्यता आहे. परिणामी कांदा बियाणे उत्पादकांसाठी चांगली बातमी आहे.
देशात मागील पाच वर्षांची कांदा लागवडीची सरासरी पाहता खरीपाची लागवड साडेपाच लाख हेक्टर तर रबीचे सरासरी क्षेत्र १० लाख २६ हजार हेक्टर इतके आहे. एकूण सरासरी कांदा लागवड क्षेत्र सुमारे १५.४४ लाख हेक्टर इतके आहे. यंदा त्यात वाढ होऊन १६.७९ लाख हेक्टर इतके झाले. मागच्या वर्षी हेच देशाचे एकूण लागवड क्षेत्र हे १५.३८ हेक्टर इतके होते. कांदा संशोधक आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कांदा लागवडीसाठी सरासरी हेक्टरी ११ किलो बियाणे लागते. हे गृहित धरता यंदाच्या वर्षी मागच्या पेक्षा बियाणांची गरज जास्त होती.
दरम्यान यंदा चांगल्या पाऊसमानाचा अंदाज असल्याने यंदा सरासरी लागवड क्षेत्राइतकेच कांदा बियाणे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. रबीला कांदा बाजारभाव यंदा कमी मिळाल्याने अनेक शेतकरी पुन्हा कांदा सोडून इतर पिकांकडे वळण्याची शक्यता आहे. हे जरी गृहित धरले तरी सरासरी इतकी म्हणजेच सुमारे ५. २५ लाख हेक्टरपर्यंत खरीप आणि लेट खरीपाची कांदा लागवड होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच चांगला पाऊस झाल्यास आणि भुजलपातळी वाढीसह धरणांमध्ये चांगला जलसाठा झाल्यास रबीची लागवडी सरासरी इतकी राहण्याची शक्यता असून कांदा बियाणांचा तुलनेने बरी मागणी असणार आहे.
सद्या कृषी विद्यापीठाचा कांदा बियाणे दर प्रति किलो १५०० रुपये, राष्ट्रीय बागवानी मंडळाचा दर प्रति किलो साधारणत: २ हजार रुपये तर खासगी कंपन्यांचा प्रति किलो २ हजाराच्या वर असा आहे. यावरून कांदा बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे विक्रीचा अंदाज घेता येईल.