दोन महिन्यापूर्वीच्या मंदीनंतर आता रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू झाली आहे. जसा ऊस हंगाम पुढे जाईल तशी ऊस रोपांना महाराष्ट्रसह, गुजरात, मध्य प्रदेश मधूनही मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे वैविध्यपूर्ण वाणांच्या रोपांना चांगली मागणी आहे.
अनेक रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांना आवश्यक ती रोपे पुरवण्यासाठी झगडावे लागत आहे . कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तोडणी ही वेगात सुरू झाली. शेत रिकामे झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रोप लावणीला पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे.
कांडी लावण केल्यानंतर थंडीमुळे ऊसाची वाढ ही कमी होते. त्यामुळे तयार रोपांची लागवड केल्यास उसाचा कालावधी कमी होत असल्याने शेतकरी रोप लावणी ला प्राधान्य देत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील रोपवाटिकांमधून देशभरामध्ये ऊस रोपे दिले जातात. विशेष करून महाराष्ट्र सह, कर्नाटक गुजरात, मध्य प्रदेश मध्ये रोपवाटिकांना चांगली मागणी असते.
नोव्हेंबर पर्यंत ऊस तोडणी फारशी वेगात सुरू नसल्याने मागणी ठप्प होती. ज्या रोपवाटिकांकडे रोपे शिल्लक होती त्यांची वाढ प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने ही रोपे अक्षरशः चारा म्हणून वापरावी लागली. ज्या रोपवाटिका नुकत्याच सुरू झाल्या होत्या त्यांना याचा मोठा फटका बसला. ज्या रोपवाटिका नुकसान सोसून उभ्या राहिल्या त्यांना आता या मागणीचा फायदा होत आहे.
कारखाने जसे सुरू होतील तशी मागणीत वाढ होते . . यंदाचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता असल्याने लागवडी वेगात होण्याची शक्यता आहे . त्यामुळे रोपवाटिका चालक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रसंगी जादा रक्कम देऊन संबंधित जातीचे ऊस बियाणे खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.
राज्यात विविध ठिकाणी दोन वर्षांपर्यंत ८६०३२, २६५ आदी ऊस वाण सर्वाधिक विक्री होणारे वाण होते. गेल्यावर्षीपासून शेतकऱ्यांमध्ये वाण बदलण्याची मानसिकता होत आहे . विद्यापीठांनी, संशोधन संस्थांनी अनेक वाणांचे मिश्रण करून नव्या जातीचे वाण विकसित केले आहेत.
या पैकी ५०१२, १८१२१, २६५, १३३७४, १३४३६ या वाणांना राज्यातून मागणी आहे. या बरोबर गुजरात मध्ये २६५ तर मध्य प्रदेशात ८००५ वाणाला अधिक मागणी आहे. भौतिक परिस्थिनुसार वाढ होणाऱ्या वाणांची मागणी शेतकरी करत असल्याचे चित्र आहे.
”डिसेंबर पर्यंतचा काळ रोपवाटिकांची परीक्षा पाहणारा ठरला. मागणी नसल्याने रोपांचे रोपवाटिकेत मोठे नुकसान झाले . ऊस तोड सुरू झाल्यानंतर चित्र पालटले ज्या भागात पुरेश्या पाण्याच्या उपलब्धतेची खात्री आहे. त्या भागातून रोपांची मागणी वाढत आहे . विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे लोकप्रिय वाणापेक्षा नवीन वाणांनाही चांगली मागणी आहे.
– प्रल्हाद पवार, रोपवाटिका चालक, जांभळी, जि. कोल्हापूर












