
जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात जिल्हानिहाय पाऊसमान आणि थंडी कशी राहू शकते? याविषयी, शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे? थंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहू शकते? कुठे तापमान जास्त राहील ? या शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आम्ही हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्याकडून जाणून घेतली.
जानेवारीमध्ये पाऊस कसा राहील ? हा प्रश्न आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनात असेल याविषयी उत्तर देताना खुळे यांनी सांगितले की… महाराष्ट्र राज्याची जानेवारी महिन्यातील पावसाची सरासरी नगण्य म्हणजे ६ मिलिमीटर आहे. म्हणजेच एक किंवा दोन पावसाचे सरासरी दिवस असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी जानेवारी महिन्यात सरासरी किंवा सरासरीपेक्षा काहीसा अधिक पावसाचा अंदाज असला तरी तो नगण्यच पाऊस समजावा असे वाटते.
चालू आठवड्यात जिल्हा निहाय पाऊस आणि तापमान कसे असू शकते ? तर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ श्री खुळे म्हणाले की , मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अमरावती ,नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली अशा 22 जिल्ह्यांमध्ये 8 जानेवारी पर्यंतच्या पहिल्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते . झालाच तर या जिल्ह्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता असू शकते अन्यथा नाही, मराठवाड्यात मात्र ढगाळ वातावरणही नसेल किंवा पावसाची शक्यताही नसेल महाराष्ट्रात सध्या पहाटेचे किमान तापमान 18° व दुपारचे कमाल तापमान २८ अंश आहे. संपूर्ण आठवडा म्हणजे ७ जानेवारीपर्यंत ह्याच पातळीत तापमान राहू शकते.
जिल्ह्यानिहाय थंडीच्या लाटा कशा असू शकतात? याविषयी बोलतानाच श्री. खुळे म्हणाले की……मुंबईसह कोकण, मध्यमहाराष्ट्रातील खानदेश, नाशिकपासून ते सांगली पर्यंतच्या ८ जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील जालना, हिंगोली, लातूर तसेच विदर्भातील अकोला ते गोंदिया पर्यंतच्या ७ अश्या एकूण 25 जिल्ह्यांमध्ये ‘ एल-निनोच्या ‘ जानेवारी महिन्यात मासिक अंदाजानुसार एखादी दुसरी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पूर्व नगर जिल्हा ,सोलापूर ,छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, धाराशिव ,नांदेड, बुलढाणा, यवतमाळ ,चंद्रपूर ,गडचिरोली या अकरा जिल्ह्यात सरासरीपेक्षा थंडीच्या लाटा कमी जाणू शकतात.
महाराष्ट्रातील थंडीच्या लाटा कशा असतात आणि थंडीची लाट कशी लाट कशी ओळखावी ? हे सांगताना श्री. खुळे म्हणाले की… अलीकडच्या ५० वर्षाच्या आकडेवारीनुसार एल-निनोच्या वर्षात हिवाळ्यात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान जास्तीत जास्त ४ ते ६ वेळा थंडीच्या लाटा येऊ शकतात. एखाद्या ठिकाणचे एखाद्या दिवशीचे किंवा ठराविक कालावधीतील पहाटेचे किमान तापमान हे मैदानी भागात 10 अंश किंवा त्याखाली गेले असेल तसेच पर्वतीय क्षेत्रात जर शून्य अंश किंवा त्याखाली गेल्यास तसेच त्या ठिकाणचे किमान तापमान सरासरीच्या जर साडेचार ते साडेसहा अंशाने खालावले असेल तर त्या ठिकाणी थंडीची लाट आली, असे समजावे. तीव्र किंवा अतितीव्र अश्या थंडीच्या लाटाही खालावलेल्या किमान तापमानाच्या पातळीनुसार ठरवल्या जातात.