राज्य शासनाने सोडत पद्धत रद्द करुन ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केल्या मुळे आतापर्यंत २३ हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून शेततळे खोदाईला अनुदान देण्याची योजना सर्वप्रथम आखण्यात आली होती.
२००९ पासून केंद्राने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळ्यांसाठी अनुदान देण्यास सुरुवात केली . त्यानंतर शेततळे खोदाईकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यानंतर २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक स्तरावर ‘मागेल त्याला शेततळे’ ही स्वतंत्र योजना आणली. मात्र ५० हजार रुपये केवळ अनुदान असल्यामुळे योजनेचा अपेक्षित प्रसार झाला नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत २९ जून २०२२ रोजी शेततळ्याचा समावेश झाला व ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदानदेखील वाढविण्यात आले. त्यामुळे शेतकरी शेततळे खोदाईसाठी पुन्हा उत्सुकता दाखवू लागले.
अर्ज केल्यानंतर सोडत काढली जात असल्यामुळे शेतकयामध्ये अनुदान मिळते की नाही, या बाबत संभ्रमावस्था होती.तसेच शेतकऱ्यांचे सोडतीत अर्ज मंजूर न झाल्यास इच्छा असूनही तळे खोदता येत नव्हते . परंतु आता सरकारने सोडत पद्धत हटवून अर्ज करताच शेततळे देण्याचे नवे धोरण आणल्यामुळे पहिल्याच टप्प्यात राज्यामध्ये सहा हजाराच्या आसपास नवी शेततळी खोदली गेली आहेत.
शेततळे योजनेची वाटचाल खालील प्रमाणे आहे…
शेततळ्यासाठी अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या- ५९७६
नवीन शेततळ्यांना मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या- २३१३३
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये अनुदानस्वरूपात जमा झालेली रक्कम – ४०.८९ कोटी रुपये
या योजनेसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट – १३५००
अहमदनगर जिल्हा राज्यात शेततळ्यासाठी आघाडीवर..
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत. ३४ हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्यात मात्र केवळ पाच हजार शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केली. त्यातून तळे खोदण्यास ४३०० शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली.
पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या अशी ः ठाणे १५३, पालघर १६९, रायगड १४९, रत्नागिरी ४८, सिंधुदुर्ग २७, नाशिक २९४१, परभणी ३६७, हिंगोली २१५, बुलडाणा ३३७, अकोला २५१, वाशीम २४६, यवतमाळ ५४८, वर्धा ९९, नागपूर १३४, धुळे २३६, जळगाव ३३१, नंदुरबार १४३, पुणे १०२७, सोलापूर २१८५, सातारा ३०१, सांगली १६७२, कोल्हापूर १९९, छत्रपती संभाजीनगर १६६३, जालना १५२४, बीड ९७०, लातूर २६२, धाराशिव ५०९, नांदेड ५९०, भंडारा ८६, गोंदिया १४६, चंद्रपूर ३०२, गडचिरोली ७६८.