विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू होणार या बद्दल उत्सुकता लागली आहे . अर्थातच अंतिम निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा असेल आणि आयोग कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर करू शकते .
१० ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. ही महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे म्हटले जात होते. परंतु सोमवारी सकाळी पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत. आता उद्याची मंत्रिमंडळ बैठक ही शेवटची असेल असे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आणि शासन निर्णयांद्वारे महायुती सरकारने निर्णयांचा सपाटा लावला आहे, त्यात उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीची भर पडणार आहे.
१५ तारखेलादेखील मंत्री महोदयांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १६ किंवा १७ तारखेला निवडणूक आचारसंहिता लागेल, असा भाजपच्या गटातून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. १५ तारखेला आचारसंहिता लागू होईल अशी आयएएस लॉबीमध्ये चर्चा आहे.
२६ नोव्हेंबर पूर्वी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निकालासह पूर्ण केली जाईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधीच स्पष्ट केले आहे. ३० दिवसांचा आचारसंहितेचा कालावधी असेल हे लक्षात घेता आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू केली जाण्याची शक्यता आहे. कारण निकालानंतर २६ नोव्हेंबर पर्यंत विधानसभेचे पहिले अधिवेशन घ्यावे लागणार आहे.
महायुती सरकार जास्तीत जास्त निर्णय घेता यावेत म्हणून पद्धतशीरपणे निवडणुकीला बगल देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. परंतु , हा आमचा अधिकार नाही, निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असे महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजपमध्ये हालचाली..
रविवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली.या बैठकीत विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.