.

Agricultural Project : फळे आणि भाजीपाला शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री आणि निर्यातीसाठी आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील बापगाव आणि नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे पणन सुविधा प्रकल्प उभारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून राज्यातील शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक पणन सुविधा प्रकल्प उभारला जाणार आहे.
यासाठी इतर देशातील तसेच इतर राज्यातील अत्याधुनिक सुविधा केंद्राचा अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात याबाबत बैठक झाली. आमदार चरणसिंग ठाकूर, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सल्लागार मझार्स ॲडव्हायजरी एलएलपी फर्मचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र हे फळे आणि भाजीपाला निर्यात क्षेत्रातील आघाडीचे राज्य असून राज्यातील शेतीमालाची निर्यात वाढवण्यासाठी भिवंडी तालुक्यातील बापगाव आणि काळडोंगरी येथे येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पणन सुविधा प्रकल्प उभारला जाईल, यासाठी इतर देशातील तसेच इतर राज्यातील अत्याधुनिक सुविधा केंद्रांचा अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात यावा. या प्रकल्पात विविध फळांसाठी उपयुक्त आणि ऑटोमॅटिक काम करणारी अत्याधुनिक यंत्रणा असावी तसेच या सुविधा निर्माण झाल्यानंतर त्या कायम सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी.
अशा असणार सुविधा
बापगाव येथील जागेवर फळे भाजीपाला निर्यातीकरिता व्हेपर हिट ट्रिटमेंट प्लँट, विकिरण सुविधा, पॅक हाऊस उभारणे, शीतगृह आणि पॅक हाऊस सुविधा असलेले आयात हब उभारणे, साठवणूक सुविधा, सार्वजनिक खासगी भागीदारीकरिता सुविधा, व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारणे आदी या प्रकल्पातील मुख्य घटक आहेत. तर काळडोंगरी येथील जागेवर संत्रा फळाकरिता तसेच मिरचीकरिता पॅकहाऊस, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेज, ग्रेडींग लाईन, धान्य व तेलबियाकरिता ग्रेडींग लाईन, ग्रेन शेड सुविधा, वाळलेल्या मिरचीकरिता मेकॅनिकल स्टेम कटींग मशीन, व्हॅक्युम पॅकींग सुविधा, सोलर टनेल डायर, कोल्ड स्टोअरेज, गोदाम उभारणीकरिता जागा, सार्वजनिक खासगी भागीदारीकरिता जागा, व्यावसायिक कॉम्प्लेक्स आदी निर्माण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.