
*Havaman andaj : राज्यातील प्रत्येक गावात हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारच्या महावेध प्रकल्पास पुढील पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून, यामुळे गावागावात हवामान निरीक्षण शक्य होणार आहे.
हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेताच्या जवळच असलेल्या हवामान केंद्रातून तापमान, पाऊस, आर्द्रता, वारा यासारखी माहिती मिळू शकेल.
सध्या महसूल मंडळाच्या पातळीवर अशा केंद्रांची यंत्रणा कार्यरत आहे. मात्र आता जी गावपातळीवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे, त्यामुळे हवामान आधारित शेती सल्ला अधिक अचूक आणि प्रभावी होईल. याचा फायदा शेतकऱ्यांना पीक नियोजन, खत वापर, सिंचन आणि विमा योजनेतील दावे यामध्ये होईल.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मे. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लि. ही खासगी संस्था निवडण्यात आली आहे. जेथे यापूर्वी महसूल मंडळ पातळीवर केंद्र उभारलेले आहेत, अशा गावांना वगळून उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये ही नवी केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
हवामान केंद्रातून मिळणारी माहिती विविध शासकीय विभागांद्वारे वापरण्यात येते. मदत व पुनर्वसन विभाग, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, कृषि विज्ञान केंद्रे, कृषि विद्यापीठे आणि रिमोट सेन्सिंग संस्थांना या माहितीचा मोठा उपयोग होतो.
या केंद्रांमुळे दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर, वादळ, ढगफुटी, थंडी किंवा उष्णतेच्या लाटा यासारख्या आपत्तींचा अचूक अंदाज घेता येईल. यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी वेळेत निर्णय घेणे शक्य होईल.
या संपूर्ण उपक्रमासाठी कृषि विभाग नोडल विभाग म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
ही योजना ग्रामीण भागातील हवामान साक्षरता वाढवण्यासाठी एक मोठं पाऊल असून, यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होण्यास आणि शेती अधिक शाश्वत होण्यास मदत होणार आहे.