छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजने अंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजने अंतर्गत राज्यामधील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुका कृषी अधिकारी यांनी तालुकास्तरावर पूर्व संमती दिली आहे‘मागेल त्याला शेततळे’ या योजने अंतर्गत आता पर्यंत ६ हजार ७२ शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये ४१ कोटी ६० लाख रुपये अनुदान दिले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो . या अनुषंगाने सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना अंमलात आणली आहे. शेतकऱ्यांना आता विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर तातडीने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे करुन दिले जात आहेत. राज्यात सहा हजार बहात्तर शेततळी ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत पूर्ण करण्यात आली आहेत.
कोणत्या विभागात किती रक्कम वाटप
◼️नाशिक विभागात १ हजार ७०, कोकण विभागात १४९,
◼️छत्रपती संभाजीनगर विभागात ४७४,
◼️पुणे विभागात २ हजार ९०७,
◼️लातूर विभागात २९०,
◼️कोल्हापूर विभागात ७०८,
◼️ अमरावती विभागात १८७ आणि नागपूर विभागात २८७
असे राज्यात ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत सहा हजार बहात्तर शेततळी पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये ४१ कोटी ६० लाख ६५ हजार ४९५ रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज करायचा असेल अशा शेतकऱ्यांना कृषी विभागाने , त्वरीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
अर्जासाठी आवश्यक काय…
– ‘महाडीबीटी’ पोर्टलवरूनच लाभार्थ्यांना अर्ज करता येतील.
– किमान साठ गुंठे जमीन शेततळे लाभासाठी आवश्यक आहे.
– दिव्यांग व महिला शेतकऱ्यांना लाभ देताना अगोदर प्राधान्य असेल.
– शेततळ्याचा लाभ यापूर्वी कोणत्याही योजनेतून घेतलेला नसावा.