
सातारा जिल्ह्यामधील खडकी गावातील प्रशांत भिकू शिंगटे यांना चाळीस एकर शेती आहे. संपूर्ण शेती ही बागायती असून त्यात सर्वाधिक क्षेत्रात ऊस व हळद लागवड केली जाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हैस व एका उस्मानाबादी शेळी ते सांभाळत होते .
उस्मानाबादी शेळीचे संगोपन आणि अर्थकारण त्यांना योग्य वाटले त्यामुळे त्यांनी गोठ्यातील जनावरांची संख्या कमी करून पूर्णपणे उस्मानाबादी शेळ्यांची संख्या वाढवली व मागील बारा वर्षांपासून ते शेळीपालन करत आहेत. शेळी पासून मिळालेल्या पिल्लांचे संगोपन करून त्यांनी टप्प्याटप्प्याने शेळ्यांची संख्या वाढवीत नेली .एका शेळी पासून सुरू केलेला हा व्यवसाय आता लहान- मोठ्या मिळून 40 शेळ्यापर्यंत पोहोचला आहे.
गोठ्याचे व्यवस्थापन
जनावरांच्या जुन्या गोठ्याच्या लगत कमी खर्चात 12 बाय 80 फूट आकाराच्या हवेशीर शेडची त्यांनी उभारणी केली.
सध्या ते मुक्त संचार व बंदिस्त पद्धतीने शेळ्यांचे पालन करतात.
शेडमध्ये लहान पिल्ले बोकड आणि मोठ्या शेळ्या असे चार विभाग त्यांनी केले आहेत.
शेळ्यांना मुक्त पणे वावरता यावे यासाठी त्यांनी मोकळी जागा उपलब्ध करून दिली .
त्यांनी एकही शेळी विकत घेतलेली नाही ,त्यांनी आधीच्या असलेल्या शेळ्यांपासूनच संख्या वाढवली .
व्यवस्थापनातील बाबी
शेळीपालन करताना प्रत्येक बाबींचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे.
शेळ्यांच्या अपेक्षित वाढीसाठी त्यांना संतुलित खाद्याचा पुरवठा केला जातो. तसेच हिरवा आणि सुक्या चाऱ्याचे नियोजन केले जाते.
शेळ्यांचे सर्व दूध पिल्लांना पिऊ दिले जाते.
गाभण शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते .त्यांना खाद्य पाणी आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.
करडाची ओळख पटविण्यासाठी त्यांना गळ्यात वेगवेगळ्या रंगाचे धागे बांधले आहेत .जेणेकरून त्यांचे वय लसीकरण आणि खाद्य व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येईल.
काही वेळा लहान करड्यांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येते. त्यासाठी शेडमध्ये कॅल्शियम विटा चाटण्यासाठी ठेवल्या जातात.
हवामानानुसार व्यवस्थापन
ऋतूनुसार शेळ्यांची व्यवस्थापन पद्धतीत आवश्यकतेनुसार बदल केला जातो जेणेकरून हवामान बदलाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.
थंडीच्या काळात पिल्लांना उबदार वातावरण ठेवले जाते तसेच वजन वय यानुसार दूध पाजले जाते.
पावसाळ्यामध्ये शेड कोरडा व स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जातो.
आरोग्य व्यवस्थापन
शेळ आणि बोकड यांना वर्षभर वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे शेळ्या आजारास बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.
अडीच महिन्यातून एकदा जंतनाशक दिले जाते.
लसीकरण केल्यानंतर किमान चार तास शेळीला कोणताही चारा दिला जात नाही.
आजारी शेळ्या व पिल्लांचे स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो.
विक्री नियोजन
मागील बारा वर्षाच्या शेळीपालनातील अनुभवातून शेळीपालनातील सर्व कामाचे नियोजन करणे सोयीस्कर झाले आहे. फार्ममध्ये वर्षभर खरेदी विक्री सुरू राहते ग्राहकांच्या मागणीनुसार फक्त बोकडांची विक्री केली जाते. वर्षाला सर्वसाधारणपणे 50 ते 55 बोकडांची विक्री केली जाते विशेषता थेट विक्रीवर भर दिला जातो सण, समारंभ, यात्रा, उत्सव या काळात बोकडांना विशेष मागणी असते त्यासाठी आधीच नियोजन करून काही बोकडांचे स्वतंत्र संगोपन केले जाते.