Onion Farmer : बांग्लादेशच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांची पुन्हा कोंडी…

Onion Farmer : भारतातून सर्वाधिक कांदा निर्यात ही बांगलादेशात होते. मध्यंतरी आपल्या देशात कांदा आवक चांगली राहावी आणि स्वस्त कांदा मिळावा यासाठी बांग्लादेशने कांद्यावरील आयात शुल्क शून्य टक्के केले होते. त्यामुळे भारतीय कांदा तिथे जाण्यास सुलभ होता.

मात्र १५ जानेवारीला ही मुदत संपली असून हे शुल्क पुन्हा लागू केल्याने कांद्याच्या किंमती पुन्हा घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे कांदा उत्पादक संघटना या संदर्भात पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी निर्यात शुल्क काढून टाकण्याची मागणी केली आहे.

भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सर्वाधिक कांदा निर्यात बांगलादेशमध्ये होते मागील वर्षी 20 टक्के तर त्याआधीच्या वर्षी १७ टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाला होता.
परंतु आता बांगलादेशमध्ये जानेवारीअखेरीस स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार असल्याने बांगलादेश सरकारने आज १६ जानेवारी पासून कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे.

बांगलादेश सरकारच्या या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशात होणाऱ्या कांदा निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे
दररोजच्या कांदा दर घसरणीमुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून व सर्व राज्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क पूर्णपणे रद्द करावे अशी सातत्यपूर्ण मागणी होत आहे.

बांगलादेश सरकारने तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारनेही स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा निर्यातीवरील २० टक्के निर्यातशुल्क तत्काळ शून्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

Leave a Reply