
मे २०२५ मध्ये केवळ भाताची निर्यात ९६७.०४ दशलक्ष डॉलर झाली, जी एप्रिल-मेमध्ये मिळून २०४८.६० दशलक्ष डॉलरवर पोहोचली. हा एकूण ४.७२ टक्क्यांचा सकारात्मक वाढीचा कल दर्शवतो. मसाल्यांच्या गटात ११.१९ टक्क्यांनी वाढ होऊन निर्यात ४०३.४४ दशलक्ष डॉलरवर पोहोचली. चहा व कॉफीच्या निर्यातीमध्येही अनुक्रमे २.३ टक्के आणि ८.१८ टक्के वाढ झाली आहे. चहा ६६.०६ दशलक्ष डॉलर तर कॉफी २००.७२ दशलक्ष डॉलरपर्यंत निर्यात झाली.
फळे व भाजीपाल्याचा निर्यात क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल असून मे महिन्यात या गटातून ३०७.८९ दशलक्ष डॉलरची निर्यात झाली. एप्रिल-मे एकत्रित विचार करता, हा आकडा ६९०.७८ दशलक्ष डॉलरवर गेला असून १६.४२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. हे शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहे कारण फळे व भाजीपाला यांची थेट निर्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणारी ठरते.
एप्रिल-मे २०२५ मध्ये भारताची एकूण निर्यात (वाणिज्य आणि सेवा मिळून) १४२.४३ अब्ज डॉलरपर्यंत गेली असून ५.७५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, आयात १५९.५७ अब्ज डॉलर झाली असून त्यात ६.५२ टक्के वाढ झाली आहे. मे २०२५ च्या एकट्या महिन्यात एकूण निर्यात ७१.१२ अब्ज डॉलर असून, आयात ७७.७५ अब्ज डॉलर झाली आहे. व्यापारतूट ६.६२ अब्ज डॉलरवर आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात ९.३५ अब्ज डॉलर होती.
मूल्यातील वाढीच्या बाबतीत भारतातून चांगली निर्यात जिच्याकडे झाली, त्या देशांमध्ये अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि जर्मनी यांचा समावेश आहे. या पाचही देशांत भारताच्या शेतीसंबंधित आणि प्रक्रिया उद्योग उत्पादनांच्या निर्यातीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्यातीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते की, भारतीय शेतमालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. विशेषतः मसाले, भात, फळे, भाजीपाला आणि शेतमालावर प्रक्रिया केलेली उत्पादने या गटांत शेतकऱ्यांनी जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. निर्यातक्षम शेतीच्या दृष्टीने ही माहिती मार्गदर्शक ठरू शकते.
सरकारच्या धोरणांनी आणि निर्यात प्रोत्साहन योजनेतून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शेती उत्पादनाची साठवण, प्रक्रिया व थेट विक्रीसाठी स्थानिक पातळीवर योजना राबविल्या गेल्यास, ग्रामीण अर्थव्यवस्थेत चांगला बदल घडवता येऊ शकतो.11:39 AM