Unseasonal rain : मॉन्सून कुठपर्यंत पोहोचला? अवकाळी पाऊस आणखी किती पडणार? जाणून घ्या…

Unseasonal rain : देशात यंदाचा नैऋत्य मोसमी (monsoon) पाऊस (मान्सून) हळूहळू आपल्या मार्गावर सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सून अंदमान-निकोबार बेटांपासून दक्षिण बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचला असून तो लवकरच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन भाग आणि मध्य बंगालच्या उपसागरातही सक्रिय होणार आहे. याचा अर्थ असा की, मान्सून केरळमध्ये येण्यास सुमारे दोन आठवडे बाकी असले तरी त्याच्या आगमनाची पूर्वचिन्हे महाराष्ट्रात आधीच दिसू लागली आहेत.

महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, १५ मेपासून ३१ मेपर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, महाराष्ट्रात वळवाचा गडगडाटी पावसाचा (maharashtra rain) प्रभाव जाणवणार आहे. मुंबईसमोरील अरबी समुद्रात आणि तेलंगणामधील दोन हवामान चक्रीय वाऱ्यांच्या प्रणालीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये या पावसाचा परिणाम अधिक जाणवेल.

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सध्या महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आणि वीजांसह वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. विशेषतः १८ मे रोजी मध्य महाराष्ट्रात आणि १९ मे रोजी कोकणात वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास पोहोचण्याची शक्यता आहे, झटके ७० किमी/तासापर्यंत जाऊ शकतात.

विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ३० ते ५० किलोमीटर प्रतितास असू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे, विशेषतः काढणीस आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि भाजीपाला, फळबागांसाठी आधार व्यवस्था करावी.

तापमानाच्या बाबतीत, महाराष्ट्रातील काही भागांत सध्या सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी तापमान कमी नोंदवले गेले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका तात्पुरता टळला आहे. मात्र, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उष्णता अधिक जाणवू शकते. इतर राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचे (Heat wave) संकेत आहेत, विशेषतः पंजाब, बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात.

शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. ज्या भागात जोरदार वारे किंवा गडगडाटी पावसाची शक्यता आहे, तिथे पिकांचे योग्य संरक्षण करावे. पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. मासेपालकांनी तलावाच्या काठावर जाळी बसवावी, तर जनावरांसाठी निवारा व स्वच्छ पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.

पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज:

१६ मे:: महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात वीजांसह हलका ते मध्यम पाऊस. वाऱ्याचा वेग ३०–५० किमी/तास.
१७ मे: पावसाचा जोर टिकून राहणार. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता.
१८ मे: मध्य महाराष्ट्रात जोरदार गारवारा वारा (५०–६० किमी/तास, झटके ७० किमी/तास).
१९ मे: कोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज.
२० मे: महाराष्ट्रातील काही भागांत वीजा, वारे आणि हलक्याशा पावसाची शक्यता कायम.

शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीच्या कार्यात हवामानाचा अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. हवामान खात्याच्या सूचना वेळोवेळी तपासाव्यात. हे बदल लवकरच खरीप हंगामाच्या तयारीला चालना देतील, पण त्यासाठी सज्जता हवीच.