दि. १८ डिसेंबरपर्यन्त कमी अधिक प्रमाणात थंडी जाणवणारच आहे. उत्तर भारतातून पश्चिम मध्यप्रदेशापर्यंत पोहोचलेल्या थंडीच्या लाटेमुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक ह्या चार जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्रीने घसरून तो ८ ते ९ डिग्री सेन्टीग्रेड पर्यन्त जाणवत आहे.
त्याच्या परिणामातून नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या काही भागात साधारण दवांक बिंदू तापमान व आर्द्रते मुळे खालावलेल्या किमान तापमानाला त्या ठिकाणी जमिनीवर भू -स्फटिकीकरण(बर्फाच्या किलच्या पडणे) झाले आहे.
मात्र तेथील दुपारचे कमाल तापमान हे केवळ २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत असल्यामुळे रब्बीच्या शेत पिकांना सध्या फायदा होत आहे.
तापमाने – उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटे ५ चे किमान व दुपारी ३ चे कमाल अशी दोन्हीही तापमाने सरासरी इतकी असुन भागपरत्वे किमान १० ते १४ तर कमाल २८ ते ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत असल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.
दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात पुढील चोवीस तासात फारशी तफावत जाणवनार नाही त्यानंतर पुढील दोन दिवसात किंचित घट होण्याची शक्यता आहे.












