
नाफेडची कांदा खरेदी सोमवारीही सुरू झाली नसल्याने आता ही खरेदी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. आता ही खरेदी या आठवड्यात होते की जुलैमध्ये अशी शंका कांदा उत्पादकांना निर्माण झाली आहे. तर खरेदी केलेली नाही आणि खरेदीचा दर जाहीर केल्यामुळे कांदा बाजारात भाव पडले परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
मागच्या आठवड्यात नाफेडने खरेदीचा भाव जाहीर केला होता. ९ जूनला जाहीर केलेला बाजारभाव १४३५ असा होता. त्यानंतर शनिवार दिनांक २१ जून रोजी हाच दर १६९० रुपये जाहीर झाला. मात्र अनेक माध्यमातील नाफेडच्या दर घसरण्याच्या बातम्यांमुळे बाजारभावावर विपरित परिणाम होऊन सुरूवातीला पिंपळगाव बसवंत आणि नंतर लासलगाव, सोलापूर या बाजारातील दर हळूहळू घसरत जाऊन त्यात २०० ते ४०० रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या बाजारात उन्हाळी कांद्याचा सरासरी दर १५ रुपये किलोपर्यंत घसरला आहे. दोन आठवड्यापूर्वी हाच सरासरी दर १७०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. नाफेडने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी २ जून रोजी पोर्टल सुरू केले होते. मात्र त्यात अनेकांची नोंदणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात नाफेडचे कंत्राट मिळविलेल्या सहकारी विकास सोसायट्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाचे सात बारा पाहण्याचे पोर्टल मागील दोन-ते-तीन दिवस मेटेनन्स अवस्थेत असल्याने नाफेडच्या पोर्टलवरचा सातबारा आणि त्यावरील सातबारा लिंक होऊ शकला नाही. परिणामी नोंदणी रखडल्याने खरेदी कशी करणार? असा सवाल या संस्था करत आहे.
दुसरीकडे ज्यांना नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीचे काम मिळाले अशा अनेक सहकारी सोसायट्यांना सुरूवातीला प्रति हजार टन खरेदीमागे ५ लाख रुपये बँक गॅरंटी जमा करण्याची अट आहे. अनेक संस्थांनी ही बँक गॅरंटी जमा केलेली नाही. त्यामुळे त्यांची खरेदी लांबली आहे अशीही माहिती सूत्रांकडून समजत आहे.