
Kanda bajarbhav : सोमवार दिनांक १६ जून पासून कांदा बाजारात लिलाव सुरू झाल्यानंतर हे भाव काहीसे पडलेले दिसून आले. नाशिकच्या प्रसिद्ध कांदा बाजारात अर्थात पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव बाजारात किमान आणि कमाल बाजारभाव घटलेले दिसून आले. त्यामुळे शेतकरी पुन्हा संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
मागील दोन आठवड्यापासून पिंपळगाव आणि लासलगाव बाजारात तसेच सोलापूर बाजारात कांदा बाजारभाव कमाल २५०० रुपये प्रति क्विंटल पार गेले होते. तर किमान ७०० रुपये होते. मात्र या आठवड्यात ते घटलेले दिसून आले. याला कारण नाफेडशी संबंधित काही घोटाळेबाज आणि व्यापारी व आडत्यांनी नाफेडचा चांगला दर मिळावा यासाठी कृत्रिमरित्या भाववाढ केल्याचे काही व्यापारीच सांगत आहेत.
मागील काही वर्षापासून लासलगाव आणि पिंपळगाव या बाजारातील जास्तीत जास्त किंवा कमाल बाजारभावाच्या तीन दिवसांच्या सरासरीने नाफेड आणि एनसीसीएफचे कांदा बाजारभाव ठरवले जातात आणि त्यानुसार खरेदी होते. हा अनुभव लक्षात घेऊन नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीतील संभाव्य कंत्राट मिळणाऱ्या सहकारी सोसायट्या किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असलेल्या काही भ्रष्ट व्यापारी किंवा आडत्यांनी दररोज एक दोन गाड्यांसाठी मुद्दामच जास्त पैसे दिले आणि कांदा खरेदी केला.
नाफेड आणि एनसीसीएफ कांदा खरेदीला सुरूवात होणार याची कुणकुण लागल्यापासून हा बाजारभाव वाढल्याचे एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. मागील सहा वर्षात या दोन्ही संस्थांच्या कांदा खरेदीत सुमारे २ हजार कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. तसेच मागच्या वर्षी या घोटळ्याची व्याप्ती आणि चर्चा माध्यमांमध्ये रंगल्यानंतर काही जणांवर कारवाई केली गेली. त्यामुळे येथे कांदा खरेदीत घोटाळा आणि भ्रष्टाचार होतो हे सिद्ध झाले.
एप्रिल महिन्यात कांदा बाजारात जास्त येत असल्याने तो कमी दराने विकला जातो. याचाच फायदा संबंधित भ्रष्ट लोक घेतात. हा कांदा कमी भावाने विकत घ्यायचा आणि तो साठवून नंतर नाफेड किंवा एनसीसीएफची खरेदीसाठी प्रक्रिया करायची आणि त्यांचा बाजारभाव जास्त असल्याने हा ७ ते ८ रुपयांनी आधीच घेतलेला कांदा सुमारे २५ ते २० रुपयांनी विकून नफा कमवायचा असा हा प्रकार असतो. यंदाही हा प्रकार काही जणांनी करण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता शेतकरी आणि काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी बाजारभाव कृत्रिमरित्या वाढविले आणि आता नाफेडने जेव्हा तीन दिवसांपूर्वी १४३५ रुपये प्रति क्विंटल असा राज्याच्या सरासरी इतका दर जाहीर केला, तेव्हा हे भाव घटले असे शेतकरी संघटना आणि काही जाणकार व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान नाशिक जिल्हयात मागच्या तीन दिवसांपासून कांदा बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत १ टक्क्याने घसरले आहेत. तर नगर जिल्ह्यात ७ टक्के, पुणे जिल्ह्यात १ टकक्याने घसरले आहेत. येणाऱ्या काळात हे बाजारभाव स्थिर राहू शकतील असा अंदाज आहे