
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२४ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ८२.२ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात ८२.२, मुंबई शहर जिल्ह्यात ६१.२ मिमी, ठाणे जिल्ह्यात ५९.३ आणि रत्नागिरी जिल्ह्यात ५०.६ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज २४ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ५९.३, रायगड ८२.२, रत्नागिरी ५०.६, सिंधुदुर्ग ३९.५, पालघर ८२.२, नाशिक ९.६, धुळे ४.८, नंदुरबार ७.५, जळगाव ३.९, अहिल्यानगर ०.९, पुणे १९.८, सोलापूर ०.३, सातारा १६.१, सांगली ६.८, कोल्हापूर ३५.१, छत्रपती संभाजीनगर २.१, जालना ०.९, बीड ०.३, लातूर ०.१, धाराशिव ०.३, नांदेड २.२, परभणी ०.६, हिंगोली २.४, बुलढाणा ५.३, अकोला ३.९, वाशिम ६.९ अमरावती २.९, यवतमाळ १०.१, वर्धा ५.१, नागपूर ३.२, भंडारा ८, गोंदिया ५, चंद्रपूर १७.८ आणि गडचिरोली जिल्ह्यात ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईशहर जिल्ह्यात घरचा भाग पडून एक व्यक्ती जखमी तर मुंबई उपनगर जिल्ह्यात घर पडून व झाडाची फांदी पडून या घटनेत पाच व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी आणि रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी इशारा पातळीवर असून याबाबत नागरीकांना दक्षतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीत पाणी वाढल्याने एक कन्स्ट्रक्शन बोट वाहून मासवण पुलाजवळ अडकली होती. ही बोट NDRF च्या पथकाच्या मदतीने किनाऱ्यालगत करण्यात आली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात अतीवृष्टिमुळे देहर्जे शीळ रस्ता आणि कुरंझे कंचाड रस्ता पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील पसारवाडी (माळीण), ता. आंबेगाव येथे जमिनीत भेगा पडून दरड कोसळली. जीवीतहानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माती हटवण्याचे काम सुरू असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.04:47 PM