
राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे गारपीटी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीमध्ये नुकसानीची पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले, त्यानुसार राज्यात नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहे . दोन हेक्टर ते तीन हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरातून पिकांचे प्राप्त नुकसानीचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी , विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर स्वागत केले.