
केंद शासनाने डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या आढाव्यात देशातील साखरेची उपलब्धता कमी राहील आणि त्यामुळे स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता आणि त्यानुसार ७ डिसेंबर २०२३ च्या आदेशाद्वारे केंद्र शासनाने उसाचा रस/बी हेवी मळी तसेच साखरेचा अर्क पासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी घातली .
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगात खळबळ माजली होती . इथेनॉलसाठी लागणारे बी हेवी मळीचे साठे ,कारखान्यांमध्ये तयार असलेले इथेनॉल, तसेच तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते .
तसेच इथेनॉल निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेले प्रोत्साहन आणि आश्वासनाच्या विश्वासार्हतेवर साशंकता निर्माण झाली होती आणि या क्षेत्रात झालेली व होणारी आर्थिक गुंतवणूक धोक्यात येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती .
याबाबत सर्वात अगोदर या सर्व बाबी व त्याचे गांभीर्य राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने तातडीने केंद्र शासनाच्या नजरेस आणले आणि त्यामुळे १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशाद्वारे त्यांच्या फलस्वरूप केंद्राने शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल वापरासाठी परवानगी दिली व देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना थोडासा दिलासा मिळाला .
सुधारित आदेशानुसार इथेनॉल निर्मितीकडे जास्तीत जास्त १७ लाख टन साखर वळविण्याची परवानगी देण्यात आली. परंतु डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्र,तामिळनाडू , कर्नाटक, गुजरात, या राज्यांमधील उभ्या उसाला दिलासा मिळाला त्यामुळे साखरेची उपलब्धता अगोदरच्या अंदाजापेक्षा २० ते २५ लाख टनाने वाढली.
साखर उपलब्धतेची सुधारित वाढलेली आकडेवारी आणि त्या आधारावर देशभरामधील कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेले सुमारे सात लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यासाठी विनंतीपत्र २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या विषयाच्या मंत्री गटाचे प्रमुख केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना दिले.
केंद्र शासनातील संबंधित मंत्रालयीन विभागांमध्ये त्याच्या परिणामस्वरूप तातडीने हालचाली सुरु करण्यात आल्या आणि दिनांक २४ एप्रिल रोजी सुमारे ७ लाख टन शिल्लक बी हेवी मळीचा वापर इथेनॉलकडे करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून देण्यात आली . तसेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे आसवानी निहाय ३१ मार्च अखेरच्या बी हेवी मळीच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश पारित होण्याची प्रक्रिया करण्यात आली .
इथेनॉल निर्मितीकडे या मधून सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर वळविली गेली त्यातून ३८ कोटी लिटर इथेनॉल निर्माण होईल ज्याची किंमत रु. २३०० कोटी असून . या सरकारच्या निर्णयामुळे साखरेचे साठे कमी होण्यात व त्याच्या फलस्वरूप स्थानिक साखरेचे विक्री दर सुधारण्यात मदत होणार आहे.
बी हेवी मळीच्या शिल्लक साठयांमध्ये अडकलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयाची रक्कम या एका दिलासादायक निर्णयामुळे मोकळी होणार आहे. आणि यामधून तयार होणाऱ्या ३८ कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना सुमारे २३०० कोटी रुपये इतकी रक्कम उपलब्ध होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट वेळेवर देणे व पूर्णपणे देण्यास मोठी मदत होईल.
– हर्षवर्धन पाटील अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ