Monsoon update : मान्सून पुढे सरकला, परंतु पावसाचा जोर कोकणातच..

maharashtra rain update:  राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असताना आता मान्सून अखेर पुढे सरकला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून स्थिरावलेला हा पावसाळी प्रवाह आता नाशिक, नगर, संपूर्ण खान्देश, मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागांत पोहोचला आहे. मात्र, मान्सून जरी महाराष्ट्र व्यापला असला तरी अजूनही त्याच्या प्रवाहात हवा तसा जोर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

पावसाची स्थिती विभागनिहाय वेगळी:
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, बुधवार १८ जून ते बुधवार २५ जून या आठवड्यात पावसाचा जोर मुख्यतः कोकण, मुंबई परिसर आणि विदर्भातच जाणवणार आहे. घाटमाथ्यावर मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु खान्देश, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये किरकोळ किंवा तुरळक ठिकाणीच पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.

पेरणीबाबत निर्णय घेताना काळजी आवश्यक:
जेथे आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पुरेशी ओल आहे किंवा शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करता येईल. मात्र त्याआधी स्थानिक कृषी विभागाच्या सल्ल्याने आणि वातावरणाचा अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा, अशी तज्ज्ञांची सूचना आहे. विशेषतः सोयाबीनसारख्या पिकांसाठी बक्कळ ओल आवश्यक असते. मात्र उतारानंतर सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल तरच पेरणीचा विचार करावा. कारण पावसाची खंडित स्थिती व ऊनसावल्याचे वातावरण पुढील आठवड्यात राहण्याची शक्यता आहे.

म्हणून पावसावर परिणाम:
या कमी पावसामागे काही ग्लोबल हवामान प्रणाली कारणीभूत आहेत. सध्या एमजेओ (Madden Julian Oscillation) ही प्रणाली भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कार्यरत असली तरी तिचा ‘एम्प्लिट्युड’ म्हणजे पावसासाठी आवश्यक ऊर्जा कमी असल्याने मान्सून पुरेसा बळकट झालेला नाही. ही प्रणाली जर मजबूत असती तर राज्यातील विविध भागांत पावसाला चालना मिळाली असती. सध्या इतर कोणतीही प्रमुख हवामान प्रणाली सक्रीय नसल्यामुळेही स्थिती स्थिर आहे.

असा घ्या निर्णय:
राज्याच्या बहुसंख्य भागात सध्या जी पावसाची स्थिती आहे, ती येत्या आठवडाभरात फारशी बदलण्याची शक्यता नाही. म्हणूनच पेरणीबाबत निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी आवश्यक आहे. हवामानात अचानक बदल होऊन पाऊस सक्रिय झाला, तर परिस्थिती सुधारू शकते. त्यामुळे दररोजचा हवामान अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे.

मान्सून राज्यात पोहोचला असला तरी पावसाचा खरा जोर कोकण, मुंबई आणि विदर्भातच आहे. मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाडा येथे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी सल्ल्यानेच पेरणीचा निर्णय घ्यावा, कारण हवामानाचा मूड अजूनही अनिश्चित आहे.