
fertilizers for Kharif : सध्या देशात रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असून बहुतांश रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. एकूण ६६०.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड झाली होती. यातील ९२.१९ टक्के क्षेत्रात काढणी पार पडली आहे. प्रमुख पिकांपैकी गहू, हरभरा, मोहरी, ज्वारी, गावर, उडीद, मूग यांसह अनेक पिकांची काढणी पूर्ण झाली आहे.
गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून देशात यंदा ३२६.०६ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. त्यापैकी ९२ टक्के क्षेत्रात काढणी झाली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात गहू काढणी पूर्ण झाली आहे, तर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहार या राज्यांत अजून काही ठिकाणी काम सुरू आहे. तांदुळाच्या काढणीबाबत बोलायचे झाल्यास देशातील ६१.४ टक्के क्षेत्रात काढणी पूर्ण झाली असून कर्नाटक, केरळमध्ये ती शंभर टक्के झाली आहे, तर तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात काम वेगाने सुरू आहे.
डाळींची काढणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. हरभरा, मसूर, उडीद, मूग, कुलथी, वाटाणा, खेसारी या सर्व डाळींची ९८ ते १०० टक्के काढणी झाली आहे. मात्र, आंध्र प्रदेश, बिहार आणि झारखंडसारख्या काही राज्यांमध्ये थोडीफार कामे उरली आहेत.
श्री अन्न आणि ज्वारीसारख्या भरड धान्यांची काढणी ८७.९९ टक्के पूर्ण झाली आहे. ज्वारीची काढणी बहुतांश ठिकाणी पूर्ण झाली असली तरी तेलंगणामध्ये अजून काही भागांत चालू आहे. मक्याची काढणी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पूर्ण झाली असून इतर राज्यांमध्ये अंतिम टप्प्यात आहे.
तेलबियांपैकी मोहरीसह जवळपास सगळी पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. तेलंगणामध्ये काही भागात अजून सूर्यफूल, केशर, शेंगदाणा या पिकांची काढणी चालू आहे.
दरम्यान, खतांचा साठा देशभरात समाधानकारक असून शेतकऱ्यांसाठी हंगामात अडथळा येण्याची शक्यता नाही. २८ एप्रिल २०२५ अखेर देशात युरिया ६६.१९ लाख टन, डीएपी १०.७२ लाख टन, एमओपी ८.८१ लाख टन, कॉम्प्लेक्स खतं ३८.९३ लाख टन आणि एसएसपी २२.९५ लाख टन इतका साठा शिल्लक आहे. सर्व खतांची मागणी, उपलब्धता आणि विक्री यांचा विचार करता सध्या साठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचा उल्लेख कृषी मंत्रालयाच्या अहवालात करण्यात आला आहे.
यंदा रब्बी हंगामात एकूण ६६०.६५ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या. यामध्ये गहू सर्वाधिक म्हणजे ३२६.०६ लाख हेक्टरवर, डाळी १४२.४३ लाख हेक्टर, श्री अन्न व भरड धान्य ५३.८६ लाख हेक्टर आणि तेलबिया ९५.१८ लाख हेक्टरवर लागवडीखाली आल्या. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक राहिल्याचे चित्र आहे. अजून काही राज्यांमध्ये अंतिम टप्प्यातील काढणी सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.