
‘Clean Plant’ programs : पुणे येथे झालेल्या पहिल्या ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी तंत्रज्ञान, निर्यात, आणि फलोत्पादन क्षेत्रातल्या नव्या संधींबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यामध्ये केंद्र सरकारच्या ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली.
या तीन केंद्रांमध्ये – पुण्यात द्राक्षांसाठी, नागपूरमध्ये संत्र्यासाठी आणि सोलापुरात डाळींबासाठी आधुनिक रोपवाटिकांचे प्रकल्प उभारले जातील. एकूण ३०० कोटींचा खर्च होणार असून यामुळे दरवर्षी ८ कोटी रोगमुक्त रोपे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मोठ्या रोपवाटिकेसाठी ३ कोटी आणि मध्यम आकाराच्या रोपवाटिकेसाठी १.५ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की हॅकॅथॉनमध्ये मांडले गेलेले तंत्रज्ञान – पीक काढणी, जलसिंचन, ड्रायर्स, एआय कंट्रोल रोव्हर, कीड व्यवस्थापन, प्रक्रिया यंत्रणा – हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. हे तंत्रज्ञान व्यावसायिक उत्पादनामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. कृषी विभागाने राज्यात इन्क्युबेशन केंद्रे उभारून स्टार्टअप्सला पाठबळ द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘क्रॉप कव्हर’ योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील शेती आणि फळबागांची क्षमता लक्षात घेता ‘क्लिन प्लांट’ कार्यक्रम महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय बाजारात आघाडीवर नेईल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला.