Onion cultivation : कांदा पिकासाठी शेतकऱ्यांनी कोणते बियाणे वापरावे? ‘प्रमाणित’ की ‘सत्यप्रत’?

Onion cultivation

Onion cultivation : कांदा हे अतिशय नाजूक आणि बाजारभावाच्या चढ-उतारावर चालणारे पीक असल्यामुळे याच्या उत्पादनासाठी निवडले जाणारे बियाणे सर्वोत्तम दर्जाचे असणे अत्यावश्यक आहे. पण शेतकऱ्यांपुढे एक मोठा प्रश्न कायम असतो – कांद्याच्या पेरणीसाठी ‘प्रमाणित बियाणे’ वापरावे की ‘सत्यप्रत बियाणे’?

प्रमाणित बियाणे हे सरकारच्या अधिकृत देखरेखीखाली विशेष पद्धतीने तयार केले जाते. यामध्ये उत्पादनासाठी विशिष्ट स्रोत बियाण्यांचा वापर केला जातो, नियोजित क्षेत्रावर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्पादन घेतले जाते आणि सखोल तपासणी करूनच ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. त्यामुळे त्याचा दर्जा, उगम व प्रक्रिया याबाबत शंका राहत नाही. याचे उत्पादन खर्च अधिक असल्याने ते बाजारात थोडे महाग मिळते, पण पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन अधिक चांगले येण्याची खात्री मिळते.

दुसरीकडे, सत्यप्रत बियाणे हे जरी कायद्याने मान्य असले, तरी त्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सरकारचा थेट सहभाग नसतो. अनेक वेळा या बियाण्यांचा दर्जा कमी असतो. कांदा पिकात बी उगमाची शुद्धता, अंकुरणाची टक्केवारी आणि एकसंधता अत्यंत महत्त्वाची असते. जर बियाणे गुणवत्तापूर्ण नसेल, तर कांद्याचे उत्पादन अपुरे किंवा साचके होऊ शकते आणि शेतकऱ्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शक्यतो प्रमाणित बियाणेच निवडावे. हे बियाणे थोडे महाग असले तरी उत्पादनात सातत्य, दर्जा व उत्पन्न मिळण्याची खात्री यामुळे त्याचा लाभ अधिक असतो. विशेषतः जे शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणात किंवा निर्यातीसाठी पिकवत आहेत, त्यांनी केवळ दर्जेदार व विश्र्वसनीय प्रमाणित बियाण्यांवरच भर द्यावा.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी कृषी भूषण अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी याबाबत संशोधन करून शासनाला काही सूचनाही दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की की, “शेतकऱ्यांना बोगस बियाण्यापासून वाचवायचे असेल, तर सरकारने बियाण्याच्या मूळ उत्पादन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे.” त्यांचा इशारा यासाठी महत्त्वाचा आहे की फक्त विक्री व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून दर्जा सुधारत नाही. शेतकऱ्यांनीही सजग राहून दर्जेदार बियाण्यांची निवड केली, तर उत्पादनात सातत्य आणि नफा निश्चित होऊ शकतो.