Israel-Iran tensions : इस्त्रायल-इराण तणावाचा खतांच्या किंमतीवर होणार परिणाम?

Israel-Iran tensions : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाने पुन्हा एकदा खाडी मार्गाची असुरक्षितता वाढवली आहे. २२ जून रोजी इराणच्या संसदेनं ‘हॉर्मुज सामुद्रधुनी’ बंद करण्याची शिफारस केल्यानंतर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ही सामुद्रधुनी म्हणजे जगाच्या एकूण २० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम भारतावर, विशेषतः शेती आणि इंधन खर्चावर होण्याची शक्यता आहे.

इंधन महागणार का?
भारत आपला बहुतांश कच्चा तेल साठा खाडी देशांमधून आयात करतो. सध्या देशात एकूण ७४ दिवस पुरेल इतका साठा असून त्यात ९.५ दिवसांचा ‘स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह’ही आहे. मात्र खाडी मार्ग बंद झाला, तर इंधनाची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागेल. त्यामुळे वाहतूक खर्च, विमा प्रीमियम आणि शिपिंग वेळ वाढेल, ज्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी याचा अर्थ म्हणजे ट्रॅक्टर, पंपसेट, मालवाहतूक यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च वाढणार.

खत, बियाणे आणि औषधांच्या किमतीत वाढ?
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, तर त्याचा परिणाम रासायनिक खतांच्या उत्पादन खर्चावरही होतो. युरिया, डीएपी आणि पोटॅश सारखी खते प्रामुख्याने आयात केली जातात आणि ती तयार करण्यासाठी पेट्रोकेमिकल्सचा वापर होतो. त्यामुळे खतांच्या किमतीत वाढ होऊ शकते. हेच बी-बियाणे, कीडनाशके आणि मशागती उपकरणांवरही लागू होते.

कृषी निर्यातीवर धोका?
भारत खूप मोठ्या प्रमाणावर भात, मसाले, फळे आणि भाजीपाला खाडी देशांना निर्यात करतो. हॉर्मुज सामुद्रधुनी बंद झाली, तर जहाजांची वाहतूक अडकेल. यामुळे भाजीपाला, डाळिंब, केळी, कांदा यासारख्या नाशवंत मालाची निर्यात वेळेत होणार नाही आणि त्याचे दर घसरू शकतात. फळे सडून जाण्याचा धोका वाढेल.

सरकारची तयारी काय?
भारताने आधीच रशिया, अमेरिका आणि आफ्रिकन देशांमधून तेल आयात वाढवायला सुरुवात केली आहे. केंद्रीय तेल मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, देशांतर्गत इंधन पुरवठा सुरळीत राहील. तेल कंपन्यांकडेही पुरेसा साठा आहे. मात्र जागतिक बाजारात तेलाचे दर १०० डॉलरच्या पलीकडे गेले, तर भारतातही महागाई वाढण्याचा धोका आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे?
* इंधनाचे जतन करा. पंपसेटसाठी सौर ऊर्जा वापरण्याचा विचार करा.
* शेतमालाचे साठवण व प्रक्रिया करण्यावर भर द्या.
* निर्यातीवर अवलंबून उत्पादन (जसे कांदा, डाळिंब) याबाबत सावधगिरी बाळगा.
* शासनाच्या सबसिडी व सल्ल्यांवर लक्ष ठेवा.
* खते, किटकनाशके यांचे वेळीच खरेदी करा, तसेच आवश्यकता नसल्यास युरियाचा जास्त वापर टाळा.