पीक विमा कंपनी संदर्भात मागील काही दिवसांपासून सारख्या तक्रारी येत आहेत. यावरूनच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पीक विमा कंपनीबाबत संताप पाहायला मिळाला आहे. पीक विमा लाभ वाटप करत असताना कोणते निकष लावले? जसा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे तसाच लाभ सर्व शेतकऱ्यांना द्या. नाही तर कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करतो, असा इशारा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी संदर्भात तक्रारी केल्यानंतर झालेल्या बैठकीत धनंजय मुंडें यांनी विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विमा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत मुंबईत आंदोलन केले होते. दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंगळवारी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. हदगाव तालुक्यातील 80 हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता , त्यातील कृषी विभागाकडे 40 हजार शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यामुळे या बैठकीत धनजय मुंडे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर संतापले . तुम्ही मोजक्या शेतकऱ्यांना विमा मंजूर केला, त्याच निकषानुसार इतर शेतकऱ्यांनाही विमा द्या. नाही तर मी कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करेल, अशी ताकीद धनंजय मुंडे यांनी विमा कंपनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच, पंधरा दिवसानंतर पुन्हा याबाबत बैठक घेणार असल्याचे देखील धनंजय मुंडे सांगितले .
बैठकीत यांची उपस्थिती…
दरम्यान, मुंबईत झालेल्या या बैठकीत मंत्री संदिपान भुमरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, खासदार हेमंत पाटील, बाबुराव कदम, विभागीय कृषी आयुक्त आवटे, जिल्हा कृषी अधिकारी बन्हाटे, हदगावचे शेतकरी नेते गजानन शिंदे व शिवाजीराव जाधव, संदीप पालकर, आत्माराम पाटील, नागोराव पाटील, रवीकुमार सूर्यवंशी, अविनाश पाटील, राजू पाटील आदी उपस्थित होते.
अमेझॉन, फ्लिपकार्टवर आता शेतमाल…
सह्याद्री अतिथीगृह येथे काही दिवसांपूर्वी कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक आयोजित केली होती . यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले होते,आंतरराष्ट्रीय व देशातील महत्त्वपूर्ण कंपन्यां सोबत ‘स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कृषी उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी करार करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल. कृषी विभागामार्फत कंपनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी उत्पादनांची मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी सर्व मदत देण्यात येईल. आता अमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत शेतकरी कंपनीचा शेतमाल थेट जाणार असल्याचे मुंडे म्हणाले आहेत.