अनेक ठिकाणी राज्यात परत एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशीच काही परिस्थिती मराठवाड्यात देखील पाहायला मिळत आहे, गारांचा जोरदार पाऊस नांदेड जिल्ह्यात झाला . तर, आणखी आठ दिवस म्हणजेच 20 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यावर ढगाळ स्थिती, अवकाळी पावसाचे संकट कायम असेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास नांदेड शहर व तालुक्यात अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. मराठवाड्यामध्ये अनेक भागात ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळाले. तसेच आणखी आठ दिवस अशीच परिस्थिती असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्हयात सुपारी पेक्षाही मोठ्या गारा…
रविवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सुपारी पेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांची मोठी धावपळ उडाली होती. तर शेती पिकात असलेल्या हरभरा, करडई,गहू, तूर, यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांचा पाऊस, विरसनी, कामारी, जवळगाव, सरसम यांसह अनेक गाव परिसरात झाला आहे. तसेच आंब्याच्या झाडाला आलेला मोहर देखील मोठया प्रमाणात गळून पडला आहे.
शेतकरी अवकाळी पावसामुळे परत एकदा संकटात…
बळीराजा अवकाळी पावसामुळे पुन्हा निसर्गाच्या संकटात सापडला आहे. रविवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास सुरुवातीला वादळी वारे आले, त्यानंतर थेट गारांचा पाऊस सुरु झाला. यावेळी पाऊस सुरु झाल्यानंतर पाहिल्यादा खारकी बोराएवढी व त्यानंतर सुपारी एवढया गारा पडू लागल्या व अर्ध्या तासानंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी व बाजारात आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
तातडीची मदत देण्याची मागणी…
हिमायतनगर शहरसह सर्व परिसरात जोरदार पाऊस झाला. या भागात मोठ्या प्रमाणात गारा पडल्यामुळे शेतकरी राजांचे मोठे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत द्यावी. अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट..
आज विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार . हवामान विभागाच्या अंदाज ,नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता असून ,या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.