Weather and rain update : वातावरण बदललं, राज्यात या ठिकाणी पडणार पाऊस; गारपीटही होणार..

Weather and rain update: मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वातावरण बदलले असून नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी धुके आणि ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे द्राक्षासह फळबागांवर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. उत्तरेकडे थंडी वाढली असून धुक्याचा कहर झाल्याचे वृत्त आहे.

हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या मुंबई, कोकणासहित संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडीची शक्यता ही कायम आहे.

 बुधवार आणि गुरुवार दि. २५-२६ डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित काहीशी थंडी  कमी होवून संपूर्ण महाराष्ट्रात ऊबदारपणा जाणवेल.

पावसाची अशी आहे शक्यता:
गुरुवार ते शनिवार दि. २६ ते २८ डिसेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज श्री खुळे यांनी वर्तविला आहे. त्यानुसार नंदुरबार, धुळे, जळगांव, मालेगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छ.सं.नगर अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, शेगाव, नगर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते.

कुठे होणार गारपीट                            
सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार दि. २७ डिसेंबर ला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण २५ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते.
 त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छ.सं.नगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया वर्धा, वाशिम या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते.

*गारपीटीची शक्यता का वाढली?*

सध्याच्या २६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेय ला दीड ते दोन किमी. उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची व ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैऋत्य दिशेकडून तर बंगालच्या उपसागरातून पूर्व दिशेकडून आलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांची अशा तीन वाऱ्यांच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन घडून येते-न -तेच घनीभवन होवून म्हणजेच थेट द्रविकरणाची अवस्था लगेचच ओलांडून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे.

दरम्यान वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि. ३० डिसेंबर पासून  हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा असल्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave a Reply