Rain forecast : महाराष्ट्रात १२ जूनपासून जोरदार पावसाचा अंदाज!

Rain forecast : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! गेल्या काही दिवसांपासून पुण्या-मुंबईत रखडलेला मान्सून येत्या गुरुवार, १२ जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे (IMD पुणे) निवृत्त हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १६ जून या पाच दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
 
विशेषतः, १४ ते १६ जून या तीन दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या १३ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता अधिक आहे. विदर्भातील उर्वरित ११ जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या मान्सूनची प्रगती थांबलेली असून, खान्देश, नाशिक आणि विदर्भाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. पुढील तीन दिवस तरी मान्सून सक्रियतेची कोणतीही ठोस लक्षणे दिसत नाहीत, कारण सध्या कोणतीही बळकट प्रणाली मान्सूनला पूरक नाही. मात्र, गुरुवार, १२ जूनपासून वातावरणात अनुकूल बदल होऊन मान्सूनच्या सक्रियतेसाठी आणि वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण होईल, ज्यामुळे मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे खुळे यांनी सांगितले.
 

शेतकऱ्यांसाठी सल्ला देताना खुळे यांनी सांगितले की, जे शेतकरी धूळ पेरणीचा विचार करत आहेत, त्यांनी १५ जूननंतर मान्सून सक्रिय झाल्यावर, जमिनीतील ओलावा (उत्तम वाफसा) आणि स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार पेरणीचा निर्णय घ्यावा. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची मुबलक सोय आणि सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी मात्र एक-दोन दिवसांत स्वतःच्या हिमतीवर पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ज्यांनी मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे गेल्या ८-१० दिवसांपूर्वी पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असेही खुळे यांनी नमूद केले.