
Water storage : महाराष्ट्रातील पावसाचे आगमन आणि मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात पाणीसाठ्याच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. २७ जून २०२५ रोजी राज्यातील सर्व जलाशयांमध्ये एकत्रितपणे ४२.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला असून, मागच्या वर्षी याच दिवशी हा साठा २०.२९ टक्के होता. त्यामुळे यंदा एकूण साठ्यात तब्बल २२.१३ टक्के वाढ नोंदली गेली आहे.
विभागाचे असे आहे चित्र:
विभागनिहाय पाहता, कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे ५४.५१ टक्के पाणीसाठा आहे. त्याखालोखाल पुणे विभागात ४७.६५ टक्के, नाशिकमध्ये ४१.६३ टक्के, अमरावतीत ४१.४५ टक्के आणि नागपूरमध्ये ३१.५८ टक्के साठा नोंदवण्यात आला आहे. परंतु सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे संभाजीनगर विभागात ३८.७६ टक्के पाणीसाठा असून, तो गतवर्षीच्या केवळ ९.८९ टक्क्याच्या तुलनेत तिप्पटहून अधिक झाला आहे. म्हणजेच राज्यात यंदा सगळ्यात जास्त टक्केवारीत वाढ संभाजीनगर विभागात झाली आहे. दुसरीकडे, नागपूर विभागात मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात किंचित घट झाली आहे.
या धरणांना पावसाची प्रतीक्षा
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा असणारी प्रमुख धरणे पाहता, भंडारा जिल्ह्यातील बावनथडी धरणात यंदा पाणीसाठा शून्यावर गेला असून गतवर्षी याच दिवशी त्यात ५२.५४ दशलक्ष घनमीटर पाणी होते. याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील कालीसरार धरणात केवळ ०.३५ टक्के साठा आहे तर गतवर्षी ० टक्के होता. तसेच नाशिक विभागातील गंगापूर धरणात यंदा ५९.२५ टक्के साठा असून, गतवर्षी तो ४४.०८ टक्के होता. काही ठिकाणी वाढ झाली असली तरी काही महत्त्वाची धरणे अजूनही अपेक्षेपेक्षा कमी साठ्याची स्थिती दर्शवत आहेत.
महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठा असा
राज्यभरातील महत्त्वाच्या धरणांपैकी जायकवाडी धरणात सध्या ३८.१५ टक्के साठा आहे जो गतवर्षी फक्त ४.६१ टक्के होता. उजनी धरणात यंदा ६९.०६ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी हा साठा तब्बल २८५०.६१ दशलक्ष घनमीटर होता. नाशिकमधील गंगापूर धरणात यंदा ५९.२५ टक्के पाणी आहे. गिरणा धरणात सध्या २८.५६ टक्के साठा असून गतवर्षी १२.०१ टक्के होता. भंडारदरा धरणात यंदा ४९.८३ टक्के पाणीसाठा आहे, जो मागील वर्षी फक्त १०.७३ टक्के होता.
पुणे विभागातील कोयना धरणात ४०.७३ टक्के, पवना धरणात ४८.०९ टक्के, पानशेतमध्ये ४१.६४ टक्के आणि खडकवासला धरणात ६०.६७ टक्के साठा आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत असलेल्या वैतरणा धरणात ६१.२१ टक्के साठा असून, गेल्या वर्षी तो १७.०६ टक्के होता. राधानगरी धरणातही चांगला ६२.८३ टक्के साठा आहे.
एकूणच राज्यातील जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून, अनेक मोठ्या आणि मध्यम धरणांत समाधानकारक साठा नोंदवला गेला आहे. आगामी पावसाच्या स्थितीनुसार साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने जलप्रशासन आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.11:05 AM