Tapi Mega Project : दिलासादायक, तापी मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे २.३४ लाख हेक्टर सिंचनाखाली…

Tapi Mega Project : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लवकरच सिंचनाच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे या भागातील २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. यामुळे खारपाण झालेल्या जमिनी पुन्हा सुपीक बनतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल. या ऐतिहासिक प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारांनी संयुक्तपणे करार केला असून, या योजनेची एकूण किंमत १९ हजार २४४ कोटी रुपये आहे.

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी भोपाळ येथे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराज्यीय बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह जलसंपदा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा करार ऐतिहासिक ठरेल असे सांगितले.

प्रकल्पाच्या अंतर्गत मध्यप्रदेशातील खरिया गुटी घाट येथे तापी नदीवर धरण बांधले जाणार आहे. त्याद्वारे साठवले जाणारे पाणी महाराष्ट्रातील जळगाव, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांत वळवले जाणार आहे. या प्रकल्पातून एकूण ३१.१३ टीएमसी पाण्याचा वापर होणार असून, त्यातील १९.३७ टीएमसी पाणी महाराष्ट्राला आणि ११.७६ टीएमसी पाणी मध्यप्रदेशाला मिळेल. महाराष्ट्रात ज्या भागांत पाण्याअभावी शेती संकटात आहे, तेथील परिस्थिती या योजनेमुळे पालटण्याची शक्यता आहे.

याशिवाय, या बैठकीत डांगुर्ली बॅरेज आणि जामघाट जलप्रकल्प यासारख्या अन्य प्रलंबित योजनांवरही चर्चा झाली. विशेषतः जामघाट प्रकल्पामुळे नागपूर शहराला पुढील ३०–४० वर्षांपर्यंत पाणीपुरवठा शक्य होणार आहे. ऑक्टोबरमध्ये दोन्ही राज्यांमध्ये पुढील बैठक होणार असून, त्यात इतर संयुक्त प्रकल्पांवरही चर्चा केली जाणार आहे.

तापी मेगा रिचार्ज योजना ही केवळ एक सिंचन योजना नसून, ती संपूर्ण भागाच्या आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. या योजनेला केंद्र शासनाची मान्यता मिळावी यासाठी दोन्ही राज्यांनी मिळून पुढाकार घेतला आहे.

असा आहे तापी मेगा रिचार्ज प्रकल्प:
– तापी नदीवर मध्यप्रदेशातील खरिया गुटी घाट येथे धरण
– एकूण सिंचनाला लाभ : 3,57,788 हेक्टर
– महाराष्ट्राला लाभ : 2,34,706 हेक्टर (जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती) (म्हणजेच सुमारे 5.78 लाख एकर)
– मध्यप्रदेशला लाभ : 1,23,082 हेक्टर (बुर्‍हाणपूर, खंडवा)
– एकूण पाणीवापर : 31.13 टीएमसी
– महाराष्ट्र : 19.37 टीएमसी/मध्यप्रदेश : 11.76 टीएमसी
– योजनेची किंमत : 19,244 कोटी (2022-23 ची किंमत)