Rice Price: केंद्राच्या या निर्णयामुळे भात उत्पादकांनाही बसणार फटका?

Rice Price : राज्यात नुकताच शेतकऱ्यांकडून नवा तांदूळ विक्रीला आला असून केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा केली आहे.

इच्छुक खरेदीदार गहू आणि तांदूळ साठा खरेदी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, या पॅनेलमध्ये स्वतः ला समाविष्ट करून ई- लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि बोली लावू शकतात. 72 तासांच्या आत एम्पानेलमेंट प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 18 डिसेंबर 2024 च्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यातून एकूण 500 मेट्रिक टन तांदूळ साठा देऊ केला जाणार आहे.

गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 5000 मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. गव्हासाठी, पीठ गिरण्या/गहू उत्पादनांचे उत्पादक/प्रक्रियाकर्ते /गव्हाचे अंतिम वापरकर्ते आणि तांदळाचे घाऊक व्यापारी /उत्पादक सहभागी होऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. याचा परिणाम भात उत्पादकाना मिळणाऱ्या किंमतीवर होऊ शकतो. त्यांना तुलनेत कमी पैसे मिळतील अशी भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान तांदूळासाठी किमान मर्यादा 1 मेट्रिक टन आहे आणि प्रति बोलीदार कमाल बोली 2000 मेट्रिक टनपेक्षा जास्त नसावी. गव्हाच्या बाबतीत, एकाच ई-लिलावात एकत्रित ठेवलेल्या सर्व प्रदेशांसाठी किमान 10 मेट्रिक टन आणि कमाल बोली एलटी जोडणी असलेल्या प्रक्रिया युनिट्ससाठी प्रति बोलीदार 25 मेट्रिक टन आणि एचटी जोडणीसह प्रक्रिया युनिटसाठी 100 मेट्रिक टन पेक्षा जास्त नसावी, अशीही अट आहे.

देशांतर्गत खुली बाजार विक्री योजनेमुळे वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असे केंद्र सरकारला वाटते.

Leave a Reply