राज्यातील सर्वच तालुक्यांमध्ये येत्या खरीप हंगामापासून जीआयएस नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे व राज्य ई-पीक पाहणी या दोन अॅपची मदत घेतली होती.
शेतकऱ्याला त्याने लागवड केलेल्या क्षेत्राची व पिकाची अचूक नोंद करता यावी, म्हणून राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने यंदा उन्हाळी हंगामासाठी ३४ तालुक्यांमधील साडेतीन हजारांहून जास्त गावांमधील शेतकऱ्यांना त्यांच्या लागवड केलेल्या गटाचा नकाशा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोणत्या क्षेत्रात किती लागवड झाली आहे, याची अचूक माहिती सरकारला मिळणार आहे. पिकांची झालेली लागवड अचूक मिळाल्यामुळे त्यानुसार अनेक बाबींचे नियोजन अधिक परिणाकारक पद्धतीने राज्य सरकारला करता येणार आहे.
राज्यातील सर्वच तालुक्यांमध्ये खरीप हंगामापासून जीआयएस नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी संपलेल्या खरीप व रब्बी हंगामासाठी राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे व राज्य ई-पीक पाहणी या दोन अॅपची मदत घेतली होती.
पिकांची नोंदणी राज्य सरकारच्या अॅपमधूनच केली जात होती. मात्र, राज्यातील केवळ ११४ गावांचा समावेश यंदाच्या खरीप हंगामामध्ये केंद्राच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपमध्ये करण्यात आला.
उन्हाळी हंगामासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपचा वापर…
रब्बी हंगामामध्ये गावांची संख्या ११४ वरून १४८ इतकी वाढविण्यात आली.
मात्र आता डिजिटल क्रॉप सर्व्हे या एकाच अॅपचा वापर उन्हाळी हंगामासाठी करण्यात येणार आहे.
आता केवळ जीआयएस नकाशे प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याला अर्थात ३४ तालुक्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पूर्वीच्याच पद्धतीने पिकांची नोंदणी ही उर्वरित तालुक्यांसाठी केली जाईल.
१५ एप्रिलपासून नोंदणी सुरू
■ गेल्या वर्षी १ मार्चला उन्हाळी हंगामातील ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली होती. या वर्षी ही नोंदणी शेतकऱ्यांना १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले . उन्हाळी हंगामामध्ये पिकांची लागवड खरीप आणि रब्बी हंगामाच्या तुलनेत कमी प्रमाणात असते.
■ परंतु , उन्हाळी हंगामामध्ये केवळ एकाच अॅपचा वापर केला जाणून अॅपमध्ये पूर्वी आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी काही कालावधी लागणार होता. त्यामुळे या उन्हाळी हंगामाच्या पाहणीला थोडा उशिरा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गट क्रमांकाचा मिळणार नकाशा…
■ पिकांची नोंदणी राज्य सरकारच्या अॅपमधून करत असताना संबंधित गट क्रमांकाचे केवळ केंद्र दाखवले जात होते. शेतकऱ्यांना त्या केंद्राच्या शंभर मीटर परिसरातून आपल्या पिकाचा फोटो अॅपमध्ये अपलोड करता येत होता. त्यामधूनच त्याच्या पिकाची नोंदणी होत होती.
■ आता उन्हाळी हंगामासाठी मात्र जीआयएस नकाशे निवडण्यात आलेल्या ३४ तालुक्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याने निवडलेल्या गट क्रमांकाचा संपूर्ण नकाशा शेतकऱ्याला दिला जाणार आहे.
■ शेतकऱ्यांला या नकाशानुसार पिकांची नोंदणी करायची आहे. नकाशे दिल्यामुळे गट क्रमांकाची दुरुस्ती टाळता येणार असून, पिकांची तसेच एकूण क्षेत्राची अचूक नोंदणी करण्यास मदत होईल अशी माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली.
या अॅपसाठी वापरण्यात येणारे तांत्रिक प्लॅटफॉर्ममध्ये ही बदल करण्यात आला आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील दौंड येथे त्याचे टेस्टिंग करण्यात आले आहे. ते यशस्वी झाल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले . याच अॅपचा वापर पुढील खरीप हंगामामध्ये केला जाणार आहे . जीआयएस नकाशे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.












