तुकडेबंदी कायद्यात बदल होणार; राज्य शासनाने नेमली समिती, वाचा सविस्तर ..

तुकडे बंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अर्थात एम एल आर सी व अन्य दोन अशा जमीन विषयक कायद्यातही काही बदल होण्याची शक्यता आहे.  या कायद्यात कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे का याबाबत तपासून बदलाच्या शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्य समिती नेमली आहे.

राज्यात सध्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 नुसार जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी क्षेत्राच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत.

यापूर्वी जिरायत क्षेत्रासाठी 40 गुंठे तर बागायत क्षेत्रासाठी वीस गुंठे मर्यादा होती.  त्यामध्ये राज्य शासनाने बदल करून जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठे तर बागात क्षेत्रासाठी दहा गुंठे इतकी मर्यादा केली आहे . या कायद्यातील तरतुदीत शिथिलता आणल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तरीही तुकडे बंदी कायद्यात त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  या कायद्या मागील हेतू चांगला असला तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक ठिकाणी तो जाचक ठरत आहे.  विशेषता रहिवासी कारणांसाठी लहान भूखंड खरेदी विक्री करणाऱ्या तसेच कृषी औद्योगिक कारणांसाठी छोट्या क्षेत्राचे व्यवहारात अडचणी येत आहेत. विहीर, सार्वजनिक रस्ता ,इत्यादी कारणांसाठी या कायद्यातून शिथिलता दिली असली तरी त्याची सार्वत्रिक आणि प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 महाराष्ट्र कुळवही वाट व शेतजमीन अधिनियम 1948 व त्याखालील नियम महाराष्ट्र शेतजमीन, जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्या अंतर्गत असलेले विषय या चार कायद्यात कालानुरूप बदल करणे आवश्यक आहे का? हे तपासले जाणार आहे.

या कायद्यामध्ये बदल सुचविण्याकरिता सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी ,शेखर गायकवाड, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे आणि उपयुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे विभागीय आयुक्त कार्यालय यांची समिती काम करणार आहे. याकरिता काही तज्ज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक वाटेल अथवा त्यांचे मत विचारात घेणे आवश्यक वाटल्यास त्यास राज्य शासनाने समितीला मुभा दिली आहे.  ही समिती तीन महिन्यात राज्य शासनाला अहवाल देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *