
Indian farmers : इस्रायलने इराणवर थेट हवाई हल्ले केल्यामुळे संपूर्ण जगभरात चिंता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम तेलाच्या दरांवर दिसून आला असून, एका दिवसात कच्च्या तेलाच्या दरात तब्बल ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे भारतासारख्या आयात-निर्यात अवलंबून असलेल्या देशांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. विशेषतः भारतातील शेतकरीवर्गाला याचा प्रत्यक्ष फटका बसण्याची शक्यता आहे.
ब्रेंट क्रूड तेलाचा दर तब्बल १३ टक्क्यांनी वाढून ७५.५० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचला असून, वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (WTI) तेलाचा दरही १४ टक्क्यांनी वाढून ७४.४५ डॉलरवर गेला आहे. ही वाढ गेल्या दोन वर्षांतली सर्वाधिक दरवाढ आहे. भारत आपल्याला लागणाऱ्या कच्च्या तेलाचा सुमारे ८५% भाग आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि शेतीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरांवर होतो.
भारतातील शेतकरी अजूनही डिझेलवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पेरणी, पाणी पंप, ट्रॅक्टर, थ्रेशर अशा अनेक यंत्रसामग्रीसाठी डिझेल अत्यावश्यक असते. खरिपाच्या तोंडावर जर डिझेलचे दर वाढले, तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च अधिक वाढेल. त्यामुळे शेती करणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते. त्याचबरोबर मालाच्या वाहतुकीचा खर्चही वाढेल, जे शेतमालाच्या बाजारभावावर परिणाम करू शकते. मात्र या बाबत भारत सरकार काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या इस्रायल-इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती अधिक बिघडल्यास आखाती देशांमधून होणाऱ्या तेलपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः होरमुज सामुद्रधुनीतून होणारा तेलवाहनांचा मार्ग अडथळाग्रस्त झाला, तर जागतिक बाजारात तेलाचे दर आणखी वाढू शकतात. भारतात रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असून तो ८६ प्रति डॉलरपर्यंत पोहोचल्यामुळे आयात खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.