
Rain update : काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठप्प झालेला आणि फक्त मुंबई-पुणेपर्यंतच मर्यादित असलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे.
काल गुरुवार, दिनांक १२ जूनपासून मान्सूनने वेग घेण्यास सुरुवात केली असून पुढील आठवडाभर म्हणजेच १९ जूनपर्यंत महाराष्ट्रात विविध भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. माजी हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे शेतीपूर्व मशागतीसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत आजपासून पुढील आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचेही वातावरण निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे हा पाऊस १९ जूननंतर २-३ दिवसांपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात दोन दिवस पावसाची हजेरी, नंतर विश्रांती
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गुरुवार व शुक्रवार (१२-१३ जून) मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, त्यानंतर शनिवारपासून (१४ जून) पावसात काहीशी विश्रांती येण्याची शक्यता आहे. यावेळी केवळ बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये एखाद्या दिवशी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये, असा सूचक इशाराही दिला जात आहे.
विदर्भात शनिवारीपासून पावसाचा जोर
विदर्भात आज आणि उद्या (१२-१३ जून) पावसाची शक्यता फारशी नाही. तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मात्र, शनिवारपासून १८ जूनपर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विशेषतः अधिक पाऊस होण्याची चिन्हे आहेत. पावसाचे हे वातावरण १९ जूननंतरही २-३ दिवस टिकू शकते.
राज्यात अनेक भागांत आषाढी एकादशीनंतर खरीप हंगामाची तयारी सुरू होते. त्यामुळे येणाऱ्या पावसाचा शेतीच्या दृष्टीने सकारात्मक उपयोग होणार आहे. मात्र, हवामान विभागाच्या सूचनांनुसारच पुढील कृषी निर्णय घ्यावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.