kanda bajarbhav : कांदा पुन्हा वधारला; किती दिवस टिकतील बाजारभाव…

kanda bajarbhav : दोन आठवड्यापासून कमी कमी होत जाणारे कांदा बाजारभाव या आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा हळू हळू वाढायला सुरूवात झाली आहे. काल संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच दिनांक १४ जानेवारी २५ रोजी लासलगाव बाजारसमितीत कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढलेले दिसून आले आहे.

मकर संक्रांतीला राज्यात अनेक बाजारांना सुटी होती त्यामुळे कांदा आवक मर्यादित राहिली. मागील आठवड्यात राज्यात दररोज सरासरी साडेतीन लाख क्विंटल आवक होत होती. आठवड्याच्या शेवटी आवक घटते, मात्र शनिवारीही ही आवक अडीच लाख क्विंटलच्या आसपास होती. मात्र रविवारी त्यात एकदम घसरण झाली आणि तेथूनच भाव वाढण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे.

रविवारी ८८ हजार क्विंटल, तर सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा सुमारे अडीच लाख क्विंटल कांदा बाजारात आला. मागच्या सोमवारी सुमारे चार लाख क्विंटल कांदा बाजारात आला होता. संक्रांतीच्या सुटीमुळे सोलापूर बाजाराला सुटी असल्याने कांदा आवक कमी झाल्याचे बोलले जात असले आणि इतरही काही बाजारांना सुटी असली, तरीही कांदा आवक या आठवड्यात घसरली असून बहुतेक शेतकऱ्यांकडील खरीप कांदा आता संपण्याच्या मार्गावर आहे.

त्यामुळेच १४ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात १ लाख क्विंटलच्या आसपास कांदा आवक झाली असून भावात वाढ झाली आहे. काल मकर संक्रातीला नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारात कांदा भाव वधारले आहेत. लासलागाव बाजारात सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर पिंपळगाव बाजारात १९५० रुपये पोळ कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला.

संक्रांतीला राज्यात पुणे, सातारा, नाशिक, नागपूर, अकोला या जिल्हयातील बाजारात कांद्याचे बाजारभाव सरासरी २ हजाराच्या आसपास राहिले. दरम्यान गुरुवारपासून सोलापूर बाजार सुरू होत असून त्यानंतर कांदा आवक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी बाजारभावावर काहीसा परिणाम होऊ शकतो. गुरुवार ते शनिवार या काळात बाजारभाव अगदी थोडे घसरतील अशी शक्यता आहे.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *