Kharif rice cultivation : खरीप भात लागवडीपूर्वी ‘या’ बाबी महत्त्वाच्या; जाणून घ्या..

Kharif rice cultivation : पावसाळा सुरू होत असताना भात लागवडीसाठी शेतकऱ्यांनी वेळेवर आणि शास्त्रीय पद्धतीने तयारी करणे महत्त्वाचे आहे. नाशिक जिल्ह्यात विशेषतः त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी अशा भागांत भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय पुणे जिल्ह्यात मावळ, हवेली, सातारा जिल्ह्यात जावळी, पाटणचा परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणात भात लागवडीची तयारी सुरू झालेली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रात भाताच्या रोपवाटिका तयार केल्या पाहिजेत.

रोपवाटिकेसाठी गादीवाफा तयार करताना १ मीटर रुंदीचा आणि १५ सेमी उंचीचा वाफा तयार करावा. यामध्ये शेणखत, नत्र, स्फुरद आणि पालाभरण खतांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून माती तयार करावी. एक एकर क्षेत्रासाठी ४ गुंठे रोपवाटिका पुरेशी असते.

इंद्रायणी, फुले राधा, भोगावती, फुले समृद्धी यांसारख्या वाणांची निवड करावी. वाफ्यावर बियाणे पेरण्याआधी कॅप्टाफॉलसारख्या बुरशीनाशकाने बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर अझोटोबॅक्टर आणि अझोस्पिरीलमसारख्या जैवखतांचा वापर करून बीजप्रक्रिया पूर्ण करावी.

पेरणीयोग्य पाऊस म्हणजे सलग तीन ते चार दिवस ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता कायम राहते व रोपांची उगम चांगली होते. काही वेळा पुनर्लावणीसाठी दुसरा टप्पा तयार ठेवावा, यामुळे अनिश्चित हवामानात देखील लागवड सुरळीत करता येते.

शेतकऱ्यांनी चार सूत्री भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, ज्यात गादीवाफा तयार करणे, योग्य वाण निवडणे, बीजप्रक्रिया आणि दोन टप्प्यांतील रोपवाटिकेची व्यवस्था यांचा समावेश असतो. या तंत्राने उत्पादनात वाढ होते व खर्चात बचत होते.