
Management for animals : पावसाळा सुरू होताच जनावरांसाठी विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. सतत ओलसर हवामान, दलदलीची स्थिती आणि वाऱ्याचा जोर यामुळे जनावरांना आजार होण्याची शक्यता अधिक असते. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे गोठ्यातील पाणी बाहेर जाण्याची योग्य सोय ठेवावी. छतावर लिकेज असेल तर तत्काळ दुरुस्ती करावी.
गोठा स्वच्छ, कोरडा आणि वायुवीजन युक्त असावा. जनावरांना पावसात मोकळ्या जागी ठेवू नये. गोठ्यात धातूचे छत असल्यास विजेपासून धोका संभवतो. त्यामुळे विजेच्या कडकडाटाच्या वेळी जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
चाऱ्यासाठी ज्वारी, बाजरी, मका आणि बहुवर्षीय गवतांची लागवड फायदेशीर ठरते. कोवळ्या गवतामुळे बुळकांडीचा धोका टाळण्यासाठी जनावरांना सल्फा गोळ्या द्याव्यात. जनावरांची जंत निर्मूलन करणे आवश्यक आहे.
शेळ्या आणि मेंढ्यांसाठीही पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कमी उत्पन्न देणाऱ्या शेळ्यांना कळपातून वगळून नव्या पैदासक्षम शेळ्यांची निवड करावी. पावसाळ्यात त्यांचे आरोग्य राखण्यासाठी स्वच्छ आणि उबदार निवारा देणे गरजेचे आहे. त्यांचा आहार संतुलित आणि सुरक्षित राहील याची खबरदारी घ्यावी.