
उजनी धरणातून कॅनॉल द्वारे शेतीसाठी सोडलेले पाणी, १५ डिसेंबरला बंद होईल. 25 डिसेंबर नंतर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर एक जानेवारीपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीत होईल, अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यातील एक लाख 53 हजार हेक्टर जमिनीला उजनी धरणातील पाण्याचा आधार आहे . उजनी वर अवलंबून जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पामधूनही जवळपास दहा हजार हेक्टर वरील जमिनीला पाणी मिळते . पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी उजनीतील पाणीसाठ्यावर लक्ष असते.यंदा सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आणि पावसाळा संपला त्यावेळी उजनीत 66% पाणीसाठा होता.
खरीप हंगामात उजनीतील पाण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडून दिलासा देण्यात आला. आता ते पाणी पंधरा डिसेंबर पर्यंत सुरूच राहणार आहे. त्यानंतर सोलापूर शहरासाठी एक जानेवारीला औजमध्ये पाणी पोहोचेल. या दृष्टीने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडावे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे .सध्या औज बंधाऱ्यात 2.15 मीटर पर्यंत पाणी लेव्हल आहे. त्यामुळे एक जानेवारीपर्यंत औजमध्ये पाणी पोहोचेल अशा नियोजनाने पाणी सोडण्यात येणार आहे.
शेतीचे दुसरे आवर्तन 10 फेब्रुवारीपर्यंत.
सोलापूर शहरातील 25 डिसेंबर दरम्यान पाणी सोडल्यानंतर उजनीची पाणी पातळी पाणीपातळी घटणार आहे. पाण्याची लेव्हल कमी झाल्यानंतर कॅनॉल द्वारे पाणी सोडण्यास अडचणी येतात. त्यामुळे 1 जानेवारी 2024 रोजी धरणातून शेतीला कॅनॉल मधून दुसरे आवर्तन सोडले जाईल. हे पाणी 10 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.त्यानंतर धरण उणे होईल आणि धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव राहील . त्यावेळी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील वीज पुरवठा खंडित करून पाणी उपसा देखील बंद केला जाणार आहे.
अवकाळीमुळे लांबले शहराचे आवर्तन
सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पाऊस जास्त झाल्याने औज बंधाऱ्यातील पाणी पातळी थोडीशी वाढली तर उन्हाचा पारा देखील फारसा चढलेला नसल्याने बाष्पीभवन जास्त होत नाही.कॅनॉलला पाणी आल्याने बंधाऱ्यातील शेतकऱ्यांचा उपसा कमी झाला. या पार्श्वभूमीवर उजनीतून सोडले जाणारे आवर्तन लांबणीवर पडले आहे.