
Livestock care : नाशिक, पुणे, नगरसह राज्यातील अनेक भागात तसेच घाटमाथ्याच्या भागात येत्या काही दिवसांत ढगाळ हवामान, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतीसह पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. हवामान आधारीत कृषी सल्ल्यानुसार, मेघगर्जनेसह वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गोठ्यातील व्यवस्था पावसाच्या सुरक्षेसाठी सक्षम ठेवणे गरजेचे आहे.
गाय-म्हैस यासारखी मोठी दुभती जनावरे शक्यतो गोठ्यातच ठेवावीत आणि विजा व पावसाच्या संपर्कापासून लांब असावीत. खुले पाणी, तलाव किंवा नदीसारख्या ठिकाणी त्यांना नेताना काळजी घ्यावी. पावसाळी हवामानात चारा, पिठी, खाद्यपदार्थ व औषधे प्लास्टिक किंवा ताटपत्रीने झाकून ठेवावीत जेणेकरून बुरशी किंवा ओलसरपणामुळे नुकसान होणार नाही.
जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जंतनाशक औषध देण्याचा सल्ला आहे. शेवटच्या आठवड्यात लाळखुरकत, घटसर्प आणि फर्या या रोगांपासून संरक्षणासाठी एकत्रित लसीकरण करून घ्यावे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास जनावराला तात्काळ थंड जागी ठेवावे, थंड पाण्याने भिजवलेला कापड अंगावर ठेवावा आणि तत्काळ पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
शेळ्यांच्या व्यवस्थापनात, कमी उत्पादन देणाऱ्या किंवा प्रजननक्षम नसलेल्या शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात आणि त्याऐवजी चांगल्या दर्जाच्या शेळ्या निवडाव्यात. नव्या पैदाशीसाठी सक्षम बोकडांचा समावेश करावा. मेंढ्यांच्या बाबतीत देखील त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून, जुलाब आणि उष्माघातापासून संरक्षणाची तयारी करावी. माजावर येण्यासाठी पौष्टिक आहार द्यावा आणि प्रत्येक मेंढीला खनिज मिश्रण व मीठ पुरवावे.
पीपीआर या मेंढींच्या रोगापासून संरक्षणासाठी तीन वर्षांतून एकदा लसीकरण आवश्यक आहे. हे लसीकरण वेळेवर करून घेतल्यास मेंढ्यांचे आरोग्य टिकून राहते आणि उत्पन्नात वाढ होते.
पावसाळी हवामानात जनावरांची निगा राखणे आणि आरोग्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. वेळेवर घेतलेली खबरदारी शेतकऱ्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य पावले उचलावीत, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे