Benefits to farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ३१ मार्चपूर्वी पैसे थेट खात्यात; कुणाला होणार लाभ?


Benefits to farmers : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितले की, ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात हा निर्णय समाविष्ट करण्यात आला असून, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

परभणी आणि मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १७३४.२६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यासाठी ४२६.५५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय, जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मराठवाड्यात ३३.९७ लाख हेक्टर शेती क्षेत्र नैसर्गिक संकटाने बाधित झाले आहे. त्यासाठी ३०६७.५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, आतापर्यंत २४५८.६२ कोटींचे वाटप करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ साठी ७.६३ लाख शेतकऱ्यांनी ५.२३ लाख हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा घेतला होता. परंतु, अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे २५ टक्क्यांहून अधिक क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी एकूण २१९७.१५ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शेतीसाठी पुन्हा नव्याने तयारी करता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply