Pune division : पुणे विभागातील शेतकऱ्यांना यंदा उन्हाळी हंगामासाठी धरणांतील पाण्याचे किती आवर्तने मिळणार याची उत्सुकता आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्याला दोन व नीरा डाव्या कालव्याला दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान खडकवासला कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी 18 फेब्रुवारी पासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन संपल्यानंतर 25 एप्रिल पासून दुसऱे आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी बैठकीत झाल. त्यानुसार दुसऱे आवर्तन येत्या 25 एप्रिल पासून सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.
निरा डावा कालव्यातून इंदापूरच्या शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार निरा डाव्या कालव्याला 11 मार्च ते 3 मे या कालावधीत 54 दिवसाचे उन्हाळी हंगामातील पहिले तर 4 मे ते 26 जून या कालावधीत 54 दिवसाचे दुसरे उन्हाळी हंगामातील आवर्तन शेती सिंचनासाठी दिले जाणार आहे.












